मुंबई काँग्रेसचा पराभव, पण जाब विचारायला आहे कोण?

मुंबई ज्याला जिंकवते तोच देशाचा राजा होतो, हे पुन्हा मुंबईनं सिद्ध केलं

Updated: May 25, 2019, 01:45 PM IST
मुंबई काँग्रेसचा पराभव, पण जाब विचारायला आहे कोण? title=

दीपाली जगताप पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबईत काँग्रेसला भोपळा मिळाला... पण जाब विचारणार कोण? कारण मुंबई अध्यक्ष मिलिंद देवराच हरले... त्यांना तरी कोण जाब विचारणार? कारण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणच हरले... चव्हाणांना तरी कोण जाब विचारणार? कारण विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेच हरले... आणि खरगेंना तरी कोण विचारणार राहुल गांधीच अमेठीतून हरले. पण सध्या आपण पाहुया काँग्रेसचा मुंबईत पराभव का झाला?

मुंबईकरांनी सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला नाकारलंय. मुंबईत भाजपा-शिवसेना युतीच्या सहाच्या सहा जागा तब्बल दीड लाखांच्या आघाडीनं विजयी झाल्या. देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना-भाजपामधली संघटना उभारणी यामुळे युतीसाठी विजय सोपा झाला. 

काँग्रेसमधला घोळ... 

- ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्ष बदलण्यात आला 

- संजय निरुपम विरुद्ध मिलिंद देवरा गटबाजीचा फटका मुंबई काँग्रेसला बसला

- काँग्रेसने उमेदवार निवडीतही घोळ घातला

- निवडणूक लढणार नाही म्हणणाऱ्या प्रिया दत्त शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात आल्या  

- प्रचाराचे योग्य नियोजन नसल्यानं ऊर्मिला मातोंडकरचा अपवाद वगळता मुंबईत काँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा प्रचार प्रभावी ठरला नाही 

मुंबई ज्याला जिंकवते तोच देशाचा राजा होतो, हे पुन्हा मुंबईनं सिद्ध केलं. मुंबईनं काँग्रेसला सपशेल नाकारलंय. आता काँग्रेसला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे.