भविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

महायुतीच्या रेट्यापुढे बविआ आपले गड राखण्यात यशस्वी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Updated: Oct 22, 2019, 03:38 PM IST
भविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा title=

मुंबई: बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भविष्यात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. मात्र, आपण राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. संघटनात्मक पातळीवरील राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या राजकारणाने पातळी सोडली. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत खेद व्यक्त केला.

तसेच मतदारांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल भावनिक किंवा मतदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी मी मतदानाच्या अगोदर हा निर्णय घेऊ शकलो असतो. पण मला लोकांना भावनिक करायचे नव्हते, तर मेरिटवर निवडणुकीत विजय मिळवायचा होता. म्हणून मी दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली बविआने जवळपास २८ वर्षे वसई पट्ट्यातील राजकारणावर वर्चस्व राखले आहे. हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले संबंध, पक्ष कार्यकर्त्यांवर त्यांच्या विचारांचा असलेला पगडा आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी स्थानिक राजकारणात कायमच स्वत:चे महत्त्व अबाधित ठेवले होते.

मात्र, यंदा शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांच्यामुळे बविआसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात प्रदीप शर्मा विरुद्ध क्षितीज ठाकूर ही लढत अनेक कारणांनी गाजत आहे. प्रदीप शर्मा यांनी प्रचारादरम्यान आपण वसई-विरारमधील गुंडगिरी मोडून काढू, असे सांगत ठाकूर कुटुंबियांच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राजकारण रंगतदार झाले आहे.

पालघर जिल्ह्यात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड, डहाणू या विधानसभेच्या सहा जागा आहेत. त्यापैकी वसई, नालासोपारा आणि बोईसर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. पालघर शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर विक्रमगड आणि डहाणू भाजपकडे आहे. त्यामुळे महायुतीच्या रेट्यापुढे बविआ आपले गड राखण्यात यशस्वी होणार का, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.