आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन

राम कदमांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेयं

Updated: Sep 6, 2018, 09:21 AM IST

मुंबई :  मुली पळवण्याबाबत केलल्या विधानानंतर भाजपाचे आमदार राम कदम चांगलेच चर्चेत आले आहेत. चहुबाजून त्यांच्यावर टीका होतेयं. या वक्तव्यावर भाजपतर्फे अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तर राम कदमांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेयं. घाटकोपर पोलीस पोलीस ठाण्यात तर सर्वच पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कदमांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ठिय्या आंदोलन सुरुच होतं.

तीव्र आंदोलन 

पोलिसांनी सरकारी वकीलांशी चर्चा करून गुन्हा दाखल होईल का याची चाचपणी करण्याचं आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं.  सकाळी ११ पर्यंत वाजता जर गुन्हा दाखल झाला नाही,तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.

काय होतं प्रकरण ?

सोमवारी दहीहंडीच्या निमित्तानं भाजप नेते राम कदम यांनी 'देशातील सर्वात मोठी' दहीहंडी उभारल्याचा दावा करत निवडणुकीआधी भाव खाण्याचा प्रयत्न केला... या दहीहंडीसाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती... आणि या गर्दीसमोर राम कदम जरा जास्तच जोशात आले... आणि या जोशातच त्यांचा जीभेवरचा ताबा सुटला. गर्दीसमोर कोणतंही काम असल्यास आपल्याला संपर्क साधू शकता असं सांगताना राम कदम यांनी आपला मोबाईल क्रमांक जाहीर करून टाकलाच...

शिवाय, तरुणांना सल्ला देताना त्यांचं भान सुटलं... तरुणांना कशी मदत करणार हे सांगताना कदम म्हणाले, 'एखाद्या तरुणीला प्रप्रोज केलं आणि ती नाही म्हणतेय, प्लीज मदत करा... मदत करणार... आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं... तुमचे आई-वडील म्हणाले, साहेब ही मुलगी पसंत आहे तर काय करणार मी?... तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार'. अर्थातच, या वक्तव्यामुळे राम कदम पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरलेत.