लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, काँग्रेस अजूनही सुस्तच

लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरी राज्यातील काँग्रेस अद्याप सुस्त असल्याचं चित्रं आहे.

Updated: Mar 10, 2019, 10:16 PM IST
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, काँग्रेस अजूनही सुस्तच title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरी राज्यातील काँग्रेस अद्याप सुस्त असल्याचं चित्रं आहे. राष्ट्रवादीबरोबरचा काही जागांचा तिढा, स्वाभिमानीसोबत सुरू असलेलं चर्चेचं गुऱ्हाळ, उमेदवार निवडण्यातील ढिसाळपणा सध्या काँग्रेसमध्ये दिसत आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने आपापली रणनिती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी चांगले उमेदवार देण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. शिरुरसाठी अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र काँग्रेसमध्ये असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्यातील काँग्रेस निद्रावस्थेत असल्याचं सध्याचं चित्र आहे.

लोकसभा निवडणूक : तुमच्या मतदारसंघात या तारखेला होणार मतदान

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने बहुतांश उमेदवार निश्चित केलेत,  दुसरीकडे काँग्रेस उमेदवारांबाबत निर्णय घेऊ शकत नसल्याचं चित्र आहे. दक्षिण अहमदनगरची जागा विखे-पाटील यांच्या मुलासाठी मिळावी यासाठी काँग्रेसकडून अद्याप विशेष प्रयत्न नाहीत. नगरची जागा सुटत नसल्याने काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्रच उमेदवारीसाठी भाजपच्या पायऱ्या चढत असल्याचं चित्र आहे.

काँग्रेसला धक्का, सुजय विखे-पाटील १२ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार

नंदुरबारमध्ये विद्यमान भाजपाच्या खासदार हिना गावित पुन्हा जिंकून येण्याची शक्यता आहे. गावित कुटुंबीय राष्ट्रवादीच्या संपर्कात देखील होतं, पण ही जागा सोडायची नाही या काँग्रेसच्या भूमिकेमुळे काही झालं नाही.

जालन्यात अर्जुन खोतकर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधत लढण्याच्या मानसिकतेत होते, पण त्यांना पक्षात घेऊन तिकीट देण्यासाठी नीट आखणी झाली नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काँग्रेसच्या कोट्यातून वर्धा जागा सोडणे अपेक्षित आहे. राहुल गांधी यांनी सूचना देऊनही अद्याप राज्य पातळीवर कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांची मुदत दिली आहे.

अनेक जागांवर युतीच्या उमेदवाराविरोधात रोष असूनही चांगले उमेदवार देण्यासाठी काँग्रेसची धडपड नाही. सांगली, लातूर, जालना, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवार नाहीत आणि दुसऱ्या पक्षातून उमेदवार आणण्याची रणनीती देखील नाही.

काँग्रेसचे एक नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे स्वत:च्या मुलासाठी नगरची जागा सुटावी म्हणून एकीकडे आपली सगळी शक्ती पणाला लावत आहेत, तर दुसरीकडे दुसरे नेते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीकडून आपल्या पत्नीला आपल्या जागी नांदेडमधून उमेदवारी मिळावी म्हणून आपली शक्ती खर्ची घालत आहेत. अशात काँग्रेस पक्ष मरगळलेल्या अवस्थेत आणि निर्णयक्षमता नसल्याने चाचपडत असल्याचं चित्र आहे.