Maharashta Election : राज्यात पुन्हा धुरळा, विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याची सूत्रांची माहिती, शिवसेनेमध्ये रस्सीखेच

Updated: Nov 9, 2021, 05:31 PM IST
Maharashta Election : राज्यात पुन्हा धुरळा, विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर title=

मुंबई : राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १० डिसेंबरला मतदान होणार असून १४ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. यात मुंबईतील दोन जागांसाठी, कोल्हापूर , धुळे अकोला आणि नागपूर विधान परिषदेसाठी निवडणूक होईल. २३ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची तारीख असेल, २४ नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल, २६ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.

१ जानेवारी २०२२ रोजी विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. पण त्यापैकी ६ जागांसाठीच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसने याआधी अनेकवेळा स्वबळाचा नारा दिला आहे. 

मुंबईतल्या दोन जागांमध्ये शिवसेनेचे रामदार कदम आणइ काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या जागांचा समावेश आहे. तर कोल्हापूरमध्ये सतेज पाटील, धुळे-नंदूरबार इथे अमरीश पटेल यांची जागा, नागपूरमध्ये गिरीश व्यास आणि अकोलामधील गोपीकिशन बाजेरिया यांच्या जागेचा समावेश आहे. सोलापूर आणि अहमदनगर जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.

रामदास कदम यांच्या जागेसाठी रस्सीखेच

शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांच्या जागेसाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे. रामदास कदम यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याची माहिती सू्त्रांकडून मिळतेय. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नव्या उमेदवाराची निवड केली जाऊ शकते. विधान परिषद आमदारकीसाठी शिवसेनेत सचिन अहिर, सुनील शिंदे, किशोरी पेडणेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. तसंच शिवसेनेचा सर्वात जुना चेहरा आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचं नावही आघाडीवर आहे. गेली अनेक वर्ष नार्वेकर यांना आमदारकीची संधी मिळणार अशी चर्चा आहे.