ठरलं... राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीसाठी महाविकासआघाडी आक्रमक होणार

राज्यपालांनी या प्रक्रियेसाठी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

Updated: Jul 13, 2020, 09:26 PM IST
ठरलं... राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीसाठी महाविकासआघाडी आक्रमक होणार title=

मुंबई: कोरोनाच्या आपत्तीमुळे लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेतील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी महाविकासआघाडी सरकार आता आक्रमक होणार आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात आज महाविकासआघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीअंती १२ आमदारांची नियुक्ती तातडीने व्हावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आग्रह धरण्याचे निश्चित झाल्याचे समजते. 

....ही तर आणीबाणी, राज्यपालांच्या भूमिकेवर राऊतांची पुन्हा टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात या मुद्द्यावर बराचवेळ चर्चा सुरु होती. नंतर या बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हेदेखील सहभागी झाले. राज्यपालांनी या प्रक्रियेसाठी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली असली तरी आता फारच उशीर होत असल्याने राज्य सरकार आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना विनंती करणार आहे.

'ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत'

काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वेळकाढूपणाविषयी शंका उपस्थित केली होती. ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाविकासआघाडीचे सरकार पडेल, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यपालनियुक्त सदस्यांची नियुक्ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. एकदा का भाजपचे सरकार आले की, आपल्याला हव्या त्या लोकांची विधानपरिषदेवर वर्णी लावता येईल, असे मनसुबे भाजप रचत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.