राज्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात काही भागात वादळासह पाऊस पडण्याची शक्यता.

Updated: Oct 7, 2019, 12:26 PM IST
राज्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातून परतीच्या पावसाचा हंगाम संपला तरी काही भागात वादळासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

नाशिकसह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखेपर्यंत काही प्रमाणात आकाश ढगाळ राहिल. येथे मेघ-गर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे, तर अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखेपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान राहिल आणि मेघ गर्जनेसह पाऊस पडेल.

८ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि विजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडाखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.