'मनसे जिंकवा,मुंबई वाचवा'; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी मनसेकडून वातावरण निर्मिती

Updated: Jun 23, 2021, 09:41 PM IST
'मनसे जिंकवा,मुंबई वाचवा'; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सध्या सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरु आहे. युती-आघाडी सह स्वबळाची भाषा ही राजकिय पक्षांकडून केली जातेय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून "मनसे जिंकवा,मुंबई वाचवा" अशी सोशल माडियावर मोहीम सुरू केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि इतर प्रमुख नेत्यांची छायाचित्रांसह "मनसे जिंकवा,मुंबई वाचवा" अस लिहलेल्या इमेजेस सध्या सोशल मीडियावर चांगल्याच वायरल झाल्या आहेत.

तीन महिन्या पूर्वी मनसेकडून मुंबईत लोकसभा निहाय नेते आणि सरचिटणीस यांच्या टीम कडून महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला होता. यामध्ये पक्षाची त्या विभागात किती ताकद आहे काय बदल केले पाहिजेत, या सर्वांचा आढावा घेण्यात आला होता. याचा अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे नेते आणि सरचिटणीस यांच्याकडून देण्यात आला आहे.सध्या मनसेकडून महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने विभागवार बैठका सत्र सुरू आहे.

२००७ साली मनसेच्या स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षी मनसेचे सात नगरसेवक मुंबईत निवडून आले होते, तर २०१२ साली झालेल्या निवडणुकीत मनसेला मुंबईत घवघवीत यश मिळाले आणि मनसेचे मुंबईत २७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर २०१७ साली झालेल्या निवडणुकीत मनसेची घसरण झाली आणि मनसेचे सातच नगरसेवक निवडून आले त्यातील सहा नगरसेवकांनी ही शिवसेनेत प्रवेश केला. सध्या मनसेचा एकच नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत जोरदार कमबॅक करण्यासाठी मनसेची सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे.

शिवसेना भाजपा युती तुटल्याने मनसे भाजप मुंबई महानगरपालिका निवडणुकात एकत्र येऊ शकते अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र सध्या तरी या बाबत कुठलीही अधिकृत चर्चा दोन्ही पक्षांकडून झालेली नाहीये."या युती बाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही या बाबत मनसे प्रमुख राज ठाकरे बोलतील मात्र मनसे कार्यकर्ते तयारी ला लागले आहेत त्यातूनच सोशल मीडिया वर अस कॅम्पेन सुरू आहे या वेळी मनसेला चांगल यश मिळेल"अशी प्रतिक्रिया झी २४ तास सोबत बोलताना मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दिली आहे.