शिवसेनेच्या खासदाराकडून मराठी तरुणांचे खच्चीकरण; मनसेचा गंभीर आरोप

दिल्लीत गेलेला माणूस बदलतो हे ऐकलं होतं, पण माणसं इतकी बदलतील असं वाटल नव्हतं. 

Updated: Jun 15, 2020, 03:36 PM IST
शिवसेनेच्या खासदाराकडून मराठी तरुणांचे खच्चीकरण; मनसेचा गंभीर आरोप title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर आपल्या मूळगावी परत गेल्यानंतर महाराष्ट्रात मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, शिवसेनेचे काही नेते मराठी तरुणांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला आहे. शिवसेना स्वत:चाच इतिहास विसरत चालली आहे. 'बजाव पुंगी,हटाव लुंगी', एअर इंडिया मध्ये केलेली आंदोलनाचा शिवसेनेला विसर पडल्याचे टीकास्त्र सरदेसाई यांनी सोडले.

'भूमिपुत्रांनो महाराष्ट्राला आत्मनिर्भर करा, उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा भासून देऊ नका'

परप्रांतीय मजूर गावी गेल्यानंतर मराठी तरुणांना संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार मराठी तरुण उत्तम काम करत आहेत. या तरुणांच्या मागे ताकदीने उभ राहायचे सोडून शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणतायत की, मराठी तरुण काही करु शकत नाहीत. त्यांना काही जमणार नाही. मराठी तरुणांना प्रोत्साहन देण्याचे सोडून त्यांचे खच्चीकरण अरविंद सावंत करत आहेत. हे सहन करुन घेतले जाणार नाही. दिल्लीत गेलेला माणूस बदलतो हे ऐकलं होतं, पण माणसं इतकी बदलतील असं वाटल नव्हतं. सावंत यांनी ते परप्रातीयांचे नव्हे तर मुंबई-महाराष्ट्राचे खासदार आहेत, हे विसरु नये, असा इशारा नितीन सरदेसाई यांनी दिला.

दादरमध्ये मनसेच्या नेत्याने सुरु केला भाजीविक्रीचा स्टॉल

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या शहरी भागांतील मजूर मोठ्याप्रमाणावर आपापल्या गावी परतले होते. त्यामुळे सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी उद्योगधंदे आणि कारखान्यांमध्ये मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगधंद्यांना मनुष्यबळाची चणचण भासून देऊ नका, असे आवाहन मराठी तरुणांना केले होते.