मध्य रेल्वेवर बनतंय आणखी नवं स्थानक, बदलापूर-अंबरनाथ स्थानकातील भार कमी होणार

Mumbai Local Train News Update: लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 15, 2024, 06:07 PM IST
 मध्य रेल्वेवर बनतंय आणखी नवं स्थानक, बदलापूर-अंबरनाथ स्थानकातील भार कमी होणार title=
Mumbai local new chikhloli railway station will built between badlapur and ambernath

Mumbai Local Train News Update: मुंबई आणि मुंबई लगतच्या शहरांत लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण मुंबई लोकलवर पडत आहे. लोकलमधील गर्दीदेखील वाढत चालली आहे. मध्य रेल्वेवरील बदलापुर आणि अंबरनाथ ही रेल्वे स्थानक गर्दीने फुलुन गेलेली असतात. या दोन स्थानकातील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाच्या निर्माणासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 73.928 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. लवकरच या स्थानकाचे काम सुरू करण्यात येणार आहे. विष्णु प्रकाश पुंगलियाया कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मुंबई रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून स्वीकृती पत्रदेखील मिळाले आहे. (Mumbai Local News Update)

अंबरनाथ आणि बदलापुर या दोन्ही शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं लोकलवरील ताणही वाढत आहे. लोकलची गर्दी कमी होण्यासाठी येथील स्थानिक नागरिक गेल्या काही दिवसांपासून चिखलोली रेल्वे स्थानकाची मागणी करत आहे. मात्र, स्थानक उभारण्यासाठी जमीन, विविध मंजुरी यासारख्या कठीण परिस्थितीवर मात करत अखेर या स्थानकाचे काम सुरू होणार आहे. या स्थानकासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनासोबत सतत संपर्क साधत रेल्वे स्थानकाचे काम मार्गी लावले आहे. 

स्थानीक आमदार डॉ. बालाजी किनिकर यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. स्थानक पूर्णपणे तयार झाल्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे. रेल्वे प्रशासनाने ऑक्टोबरमध्ये चिखलोली स्थानकात पुल, ग्राउंड आणि जिने या कामांसाठी 81.93 कोटीं रुपयांचे टेंडर काढले होते. आता रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म, शेड, पिलर, इलेक्ट्रिकल कंडक्टरसह अन्य कामांसाठी कंत्राट काढले आहे. लवकरच चिखलोली स्थानकाचे काम सुरू होणार आहे. 

सध्या चिखलोली आणि त्या परिसरातील प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकात जावे लागते. त्यासाठी दररोज 60 ते 70 रुपये खर्च करावे लागतात. पण या रेल्वे स्थानकामुळं नागरिकांचा अतिरिक्त प्रवास आणि खर्च वाढणार आहे.  सध्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकात एकूण सात किमीचे अंतर आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक ते चिखलोली रेल्वे स्थानकातील अंतर 64.17 किमी इतके आहे. तर, अंबरनाथ ते चिखलोली रेल्वे स्थानकाचे अंतर 4.34 किमी असून चिखलोली ते बदलापूर रेल्वे स्थानकातील अंतर 3.1 किमी आहे.