पाऊस...गरमागरम वडापाव आणि वाफाळता चहा...

 कीर्तीचा वडापाव खाण्यासाठी खवय्ये अगदी दूरहून  प्रवास करत येतात. 

Updated: Jun 25, 2018, 01:11 PM IST

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई  : खुशखुशीत वडा आणि आलं घातलेला चहा हे पदार्थ मुंबईकरांचा पावसाळा अधिक चविष्ट करून जातात. म्हणूनच पावसाच्या सरींसोबत मुंबईतल्या दादरमधल्या कीर्ती कॉलेजचा वडापाव चाखण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी होत आहे. वडापाव म्हणजे मुंबईकरांची अस्सल चव.. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणा-या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे.

कीर्तीचा वडापाव 

या सर्वात कीर्तीचा वडापाव खाण्यासाठी खवय्ये अगदी दूरहून  प्रवास करत येतात. ह्या लहानश्या दुकानात चुरापाव , वडापाव, डाएट वडापाव , चीज वडापाव असे निरनिराळे पदार्थ मिळतात.  या पदार्थावर खवय्ये तुटून पडतातच. मात्र या सर्वामध्ये जास्त मागणी आहे ती वडापावलाच. अनेक मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कीर्ती कॉलेज अशोक वडापाव कायमच सज्ज आहे . आपल्या मुळे अनेक खवय्यांचा पावसाळा साजरा होतो हे समाधान खूप वेगळे असल्याचे विक्रेते अशोक ठाकूर सांगतात ग्राहक देखील ह्या वडापावच भरभरून कौतुक करतात.