Mumbai Under Water: दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार! तज्ज्ञांनी कारणही सांगितलं; 2040 पर्यंत...

Mumbai Sea Level Rise: ग्लॉबल वार्मिंगचा फटका मुंबईलादेखील बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 2, 2024, 10:23 AM IST
Mumbai Under Water: दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार! तज्ज्ञांनी कारणही सांगितलं; 2040 पर्यंत... title=
Mumbai will Lose Over 10% Land By 2040 Due To Rising Sea Level

Mumbai Sea Level Rise: ग्लॉबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे.  वेळी अवेळ पाऊस, उन्हाळ्यात तापमान वाढ अशा प्रकारच्या घटना संपूर्ण जगभरात घडत आहेत. समुद्राच्या पाणीपातळीतदेखील वाढ होत असल्याचे समोर आले आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास त्याचा धोका मुंबईला बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. समुद्राची पाणी पातळी अशी वाढत चालली तर मुंबईचा 10 टक्के भूभाग पाण्याखाली जाईल, असा इशारा एका नवीन अभ्यासातून देण्यात आला आहे. पणजी आणि चेन्नईलाही असा धोका संभव असल्याचे पुढे आले आहे. 

बंगळुरूस्थित थिंक टँक 'सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अॅण्ड पॉलिसी' (सीएसटीईपी) कडून यासंदर्भातील महत्त्वाचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यास समुद्रकिनारी असलेल्या देशातील 15 शहरांची सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. यात मुंबई, चेन्नई, तिरुवनंतपुरम, कोची, मंगळुरू, विशाखापट्टणम, कोझिकोड, हल्दिया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडुपी, पारादीप, तुत्तुकुडी यांचा समावेश आहे. 

हवामान बदलामुळं समुद्राची पाणी पातळी वाढत चालली आहे. 2040 सालापर्यंत मुंबईचा 10 टक्के भूभाग पाण्याखाली जाणार आहे. 1987 ते 2021 पर्यंत मुंबईच्या समुद्र पातळीत 4.440 सेंटीमीटरची वाढ नोंदवली आहे. समुद्राच्या या वाढत्या पाणी पातळीमुळे २०४० सालापर्यंत मुंबई, पुद्दुचेरीतील यानम आणि तामिळनाडूच्या तुत्तुकुडीमधील १० टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली जाऊ शकते. चेन्नईतील ५ ते १० टक्के भूभाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यापाठापोठ कोची, मंगळुरू, विशाखापट्टणम, हल्दिया, उडुपी, पारादीप आणि पुरीतील १ ते ५ टक्के जमीन जलमय होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे

21व्या शतकाच्या अखेपर्यंत सर्व 15 शहरांमधील समुद्राची पाणी पातळी वाढत राहणार आहे. यात मुंबईला सर्वाधिक धोका असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. समुद्र पातळीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे जल, कृषी, वन, जैवविविधता आणि आरोग्य विभागावर परिणाम होण्याची भीतीही अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे

कोणत्या शहरात वाढली समुद्राची पातळी?

पश्चिम बंगालमधील हल्दियाच्या समुद्र पातळीत २.७२६ सेंटीमीटर, विशाखापट्टणममध्ये २.३८१ सेंमी, कोचीत २.२१३ सेंमी, पारादीपमध्ये ०.७१७ सेंमी आणि चेन्नईमध्ये समुद्र पातळीत ०.६७९ सेंमी वाढ नोंदवण्यात आली आहे.