जितेंद्र आव्हाड चंद्रशेखर आझाद यांच्या भेटीला

पोलिसांच्या झटापटीत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे.

Updated: Dec 29, 2018, 04:33 PM IST
जितेंद्र आव्हाड चंद्रशेखर आझाद यांच्या भेटीला title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या भेटीला गेले आहेत. 1 जानेवारीला शौर्यदिनी कोरेगाव भीमा कोरेगाव येथे दंगल सदृश्य परीस्थीती निर्माण झाली होती. शौर्य दिन 2 दिवसांवर आला असताना पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. तसेच काल भीम आर्मीच्या 15 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या मनाली हॉटेलमध्ये पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्यामुळे राज्यभरात तणावपूर्व शांतता पाहायला मिळत आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी मनाली हॉटेल ला पोचले. याचवेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच हॉटेल बाहेर घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

'आज भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांना सरकारने पोलिसांच्या नजरकैदेत ठेवले आहे. हे सरकार विरोधकाचा आवाज दाबत आहे, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे', या शब्दात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच मनाली हॉटेल बाहेर घोषणाबाजी करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांच्या झटापटीत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे.

यंत्रणा सज्ज 

राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ तुकड्या, १२०० होमगार्ड, २००० स्वयंसेवक आणि ५२० पोलीस अधिकारी कोरेगाव भीमा येथे तैनात करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज शौर्यदिनानिमित्त करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.  विजय दिनाच्या निमित्तानं कोरेगाव-भीमामध्ये १० लाख लोक येतील असा अंदाज बांधून तयारी केल्याचं नवलकिशोर राम यांनी सांगितलं.  नियंत्रण कक्ष, महिती केंद्र, अग्निशमन यंत्रणा, बसेस, अँब्युलन्स तैनात राहणार आहेत. याशिवाय चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेराचा वापर होणार आहे. मोबाईल शौचालयं आणि पाण्याच्या टँकरचीही सोय कोरेगाव-भीमामध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिलीय.