'काँग्रेसच्या पराभवासोबतच राजकीय गुलामी संपली, आता समसमान पातळीवरच चर्चा शक्य'

प्रकाश आंबेडकरांनी सर्व ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते.

Updated: May 26, 2019, 12:15 PM IST
'काँग्रेसच्या पराभवासोबतच राजकीय गुलामी संपली, आता समसमान पातळीवरच चर्चा शक्य' title=

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवासोबत राजकीय गुलामी ही संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवरच झाली पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, जागावाटपावरून ही बोलणी फिस्कटली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीत याचा मोठा फटका बसला होता. 

प्रकाश आंबेडकरांनी घडवलेल्या दलित-मुस्लिम एकीने आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फोडली. प्रकाश आंबेडकरांनी सर्व ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. आघाडीच्या अर्ध्या डझनापेक्षा जास्त जागा पाडून प्रकाश आंबेडकरांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे, तर भाजपा आणि शिवसेनेला त्यांची दखल घ्यावीच लागणार आहे.

वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित फसले; दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही नांदेड मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे पराभवाचा धक्का बसला होता. नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापराव चिखलीकर सुमारे ४० हजार मतांनी विजयी झालेत. येथे वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगरे यांनी तब्बल १ लाख ३७ हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. यानंतर अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला फायदा झाल्याची टीकाही केली होती. 

या सगळ्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काय प्रयत्न करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.