Congress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?

Rahul Gandhi Disqualification :  राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.

Updated: Mar 25, 2023, 12:32 PM IST
Congress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत? title=

Rahul Gandhi Disqualification : महाराष्ट्र विधान भवन परिसरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. सत्ताधाऱ्यांचेही राष्ट्रीय नेते आहेत आणि आमच्याकडेही जोडे आहेत, असा इशारा त्यांनी दिला. सत्ताधारी आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पाठिशी घातल आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे ते वेळकाढू धोरण काढत आहेत. सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.

सरकारचा एककल्ली कारभार चाललाय - अजित पवार

यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही संपात व्यक्त केला. राज्यातील सरकार सकारात्मक काहीच बोलत नाही. काहीही निर्णय घेत नाही. विधानसभेचे अध्यक्ष हेही काहीही निर्णय घेत नाहीत, सरकारचा हा एककल्ली कारभार चालला आहे. त्याचा महाविकास आघडीकडून निषेध करण्यात येत आहे. विधानभवन परिसरात राष्ट्रीय नेत्यांचा अपमान करणाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉकआऊट केले.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन

दरम्यान, राहुल गांधी यांची लोकसभा सदस्य रद्द केल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाणार आहे. ओबीसींच्या अपमानाची नौटंकी भाजपतर्फे केली जात आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर तोंडाला काळी पट्टी बांधून काँग्रेसच्या आमदारांनी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आदित्य ठाकरेही हाताला काळी पट्टी बांधून पायऱ्यांवर सरकारचा निषेध केला.

राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर निशाणा 

राहुल यांची खासदारकी रद्दच्या निर्णयावरुन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज जे सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांना भविष्यात विरोधी पक्षात जावं लागेल. त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. दरम्यान, राहुल यांच्या विरोधात भाजपचा ओबीसी सेल आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र राज्यात 6 एप्रिलपासून राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.