रंग बदलून सरकारमध्ये जात नाही - राज ठाकरे

राज ठाकरे यांनी जोरदार शिवसेनेला टोला लगावला आहे.  

Updated: Jan 23, 2020, 08:45 PM IST
 रंग बदलून सरकारमध्ये जात नाही - राज ठाकरे title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झेंड्यावरुन शिवसेनेने डिवचले होते. याला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टोला शिवसेनेला लगावला आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नाही, असे राज ठाकरे यांनी नाव न घेता हल्लाबोल केला. दरम्यान, मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर आपले परखड मतही राज ठाकरे यांनी यावेळी मांडले. मराठीला नख लावायचा प्रयत्न करु नका. तसेच धर्माला हात घालण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, असा इशाराही यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? अशी चर्चा सुरु आहे. मी पहिल्या सभेतच सांगितलय की, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत. आम्ही अब्दुल कलाम,  झहीर खान, जावेद अख्तर यांना नाकारु शकत नाहीत. त्याचवेळी बांग्लादेश आणि पाकिस्तानातून येणारे मुस्लिम आमचे नाहीत. त्यांना त्यांच्या देशात हाकलून द्या, असे राज म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील  ठळक मुद्दे :

-  मनसेचा हा नवा झेंडा म्हणजे महाराजांची राजमुद्रा, झेंडा कुठेही वेडावाकडा टाकू नका, निवडणुकीवेळी हा झेंडा वापरायचा नाही, पक्षाची निशाणी असलेला दुसरा झेंडा, राजमुद्रेचा मान राखला गेलाच पाहिजे- राज ठाकरे

राज ठाकरे यांचे भाषण । मनसे अधिवेशन २०२०

- मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून अंगावर जाईन, धर्मावर नख मारण्याचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन- राज ठाकरे

- देशाशी प्रामाणिक मुसलमान आमचेच आहेत, कलामांना नाकारू शकत नाही, झहीर खानला नाकारू शकत नाही, जावेद अख्तरांना नाकारु शकत नाही

- रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते- राज ठाकरे

- पाकिस्तानी बांगलादेशी मुसलमानांना हाकलून द्या, आरती त्रास देत नाही, नमाज त्रास का देतो? मशिदीवरील भोंगे बंद झाले पाहिजेत-राज ठाकरे

- सीएए एनआरसीच्या आधी समझोता एक्स्प्रेस बंद करा, राज ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

- नागरिकत्व सुधारणा कायद्यावर चर्चा होऊ शकेल, पण बाहेरुन आलेल्यांना का पोसायचं? ही लोकं कुठून आली, यांना कोण मदत करतंय? याची माहिती पोलिसांना आहे- राज ठाकरे
 सीएए एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम ३७० असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे- राज ठाकरे

- कलम ३७०वरुन मोदींचं अभिनंदन केलं, पोलिसांना ४८ तास मोकळे हात द्या, बघा काय करतात- राज ठाकरे