कोरानाचं संकट : राम कदम यांचा दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय

कोरोनाचं सावट कायम

Updated: Jun 19, 2020, 09:37 AM IST
कोरानाचं संकट : राम कदम यांचा दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय  title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करणं टाळलं जात आहे.  गणेशोत्सवापाठोपाठ आता दहीहंडीवर देखील कोरोनाचं सावट आलं आहे. भाजप नेता राम कदम यांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. कोरोनाचं संकट पाहता दहीहंडीला हजारो लोकांची गर्दी जमा होणार आहे. हे टाळण्यासाठी यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राम कदम यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. घाटकोपर परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात राम कदम दहीहंडी उत्सवाच आयोजन करतात. यावेळी हजारोंच्या संख्येत गोविंदा आणि सामान्य लोकं उपस्थित असतात. यामुळे जनहिताचा विचार करून दहीहंडीचं आयोजन न करण्याचा राम कदम यांनी निर्णय घेतला आहे. 

मुंबईत दहीहंडी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवासाठी गोविंदा पथक खूप मेहनत घेतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

#corona चे संकट पाहता आणि #दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी  लक्षात घेता #घाटकोपरला होणारी आमची देशातील #सर्वातमोठी #दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती राम कदम यांनी ट्विटमध्ये दिली आहे. 

दहीहंडीसोबतच मुंबईत गणेशोत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा मुंबईत अनेक मंडळांनी गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने तर काहींनी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.