माझ्यावर काय ही वेळ, आदित्यला साहेब म्हणावं लागतं - रामदास कदम

Ramdas Kadam on Aaditya Thackeray : शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेतून हकालपट्टी केलेले ज्येष्ठ रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.  

Updated: Jul 19, 2022, 02:57 PM IST
माझ्यावर काय ही वेळ, आदित्यला साहेब म्हणावं लागतं - रामदास कदम title=

मुंबई : Ramdas Kadam on Aaditya Thackeray : शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेतून हकालपट्टी केलेले ज्येष्ठ रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आदित्यला पण मला साहेब म्हणावं लागतं. माझं वय सत्तर आहे, पण तरीही आदित्यला साहेब म्हणावं लागतं. काय करणार? म्हणतोय ना ! कारण ते ठाकरे आहेत, मातोश्रीमधले आहेत, अशी खंत रामदास कदम यांनी आज व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी संयम पाळायला हवा होता. जे जे आमदार गेले त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिले नाही माणूस कर्तृत्वाने मोठा होतो. पक्षासोबत माणसांचेही योगदान आहे. मंत्री बनवला म्हणजे भीक दिली, असे नाही हे उद्धव ठाकरे यांनी समजू नये, असे रामदास कदम यावेळी म्हणाले. 

काका काका म्हणून माझेच खाते काढून घेतले!

मी शिवनेसाठी मोठा संघर्ष केला आणि उद्धव ठाकरे यांनी माझी हकालपट्टी केली. आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तसेच मी पर्यावरण मंत्री असताना दीड वर्ष आदित्य ठाकरे माझ्या कॅबिनमध्ये येऊन बसायचे. मला म्हणायचे भाई या अधिकाऱ्यांना बोलावा, सचिवांना बोलवा, बैठक लावा. बाहेरच्या माणसांना बसवून मंत्रालयात अधिकृत बैठका घेत येत नाही. तरीही मी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून बैठका लावल्या. प्लास्टिक बंदी मी केली आणि श्रेय आदित्यला मिळाले. काका काका म्हणणारे माझेच खाते घेऊन बसणार आहेत, हे मला माहित नव्हते, असा घणाघात रामदास कदम यांनी यावेळी केला.

तुम्ही किती लोकांची हकालपट्टी करणार आहात? इतरांची हकालपट्टी करण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला शिवसैनिक आहेत की पवार यांची माणसं आहेत ते आधी पाहा. आमदारांना शिवीगाळ, आक्रमक भाषा वापरली गेली. राष्ट्रवादी सोडावी इतकीच मागणी आमदारांची होती, बंडखोर आमदारांची येण्याची तयारी होती, पण उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही, अशी खंत रामदास कदम यांनी व्यक्त केली.