दहीहंडी रद्द करत मुंबईतील या मंडळाचे कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीला

सणांच्या धामधुमीत सामाजिक भान जपणारी एक बातमी.

Updated: Aug 14, 2019, 07:38 PM IST
दहीहंडी रद्द करत मुंबईतील या मंडळाचे कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीला title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : सणांच्या धामधुमीत सामाजिक भान जपणारी एक बातमी. कोल्हापूर, सांगलीचा पूर पाहता, मुंबईतल्या पवईमधल्या दहीहंडी मंडळानं एक चांगला निर्णय घेतला आहे. खरंच सगळ्या दहीहंडी मंडळांनी आणि गणेश मंडळांनी आवर्जून विचार करावा, असा हा निर्णय आहे. 

नारळी पौर्णिमा येताच दहीहंडीचे वेध लागतात. पण यंदा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुरामुळे दहीहंडीचा जोरदार उत्साह नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक भान जपत पवईमधल्या शिव शंभो सामाजिक प्रतिष्ठाननं दहीहंडी महोत्सव रद्द केला आहे. या मंडळाचे कार्यकर्ते गेले तीन दिवस सांगली, कोल्हापूरमध्ये मदतकार्य करत आहेत. त्याचबरोबर दहीहंडी उत्सवासाठी मिळणारे लाखो रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहेत.

यंदाचा गणेशोत्सवही साधेपणानं साजरा करुन पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुळात सामाजिक भान जपणं हाच सगळ्या सणांचा उद्देश आहे. जे पवईच्या शिवशंभो दहीहंडी मंडळानं केलं आहे. इतर दहीहंडी मंडळं आणि गणेश मंडळं यांनी देखील याचा विचार करण्याची गरज आहे. यंदा खरंच सण साधेपणानं साजरे करुया आणि पूरग्रस्तांना मदत करुन माणुसकीचा सण साजरा करुया.