शिवसेना भवनात बैठकांवर बैठका, गुवाहाटीत मात्र ‘नवी शिवसेना’ स्थापन करण्याची रणनीती

शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता असताना आता नव्य़ा शिवसेनेची चर्चा सुरु झाली आहे.

Updated: Jun 25, 2022, 06:14 PM IST
शिवसेना भवनात बैठकांवर बैठका, गुवाहाटीत मात्र ‘नवी शिवसेना’ स्थापन करण्याची रणनीती title=

मुंबई : महाराष्ट्रात सध्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) आता आपले अस्तित्व वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाचा वापर केल्याप्रकरणी शिवसेनेने निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहिले आहे.

शिवसेनेचे 38 बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये (MLA in Guvahati) तळ ठोकून आहेत. ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) यांच्या नेतृत्वाखाली नवा गट स्थापन करण्याची घोषणा करू शकतात, ज्याचे नाव शिवसेना (बाळासाहेब) असू शकते, अशी बातमी होती. विशेष म्हणजे शिंदे गटाला 10 अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. (Shivsena Balasaheb)

पक्ष स्थापनेच्या 56 वर्षानंतर शिवसेना सध्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाचा बैठकींचा सिलसिला सुरु आहे. शनिवारी मुंबईत उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेत असताना दुसरीकडे गुवाहाटीत ‘नवी शिवसेना’ स्थापन करण्याची रणनीती तयार केली जात होती.

मुंबईतील शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बाळासाहेबांच्या नावाचा गैरवापर होऊ नये, यासाठी शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिंदे पूर्वी नाथ होते पण आता दास झाले आहेत. शिंदे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वडिलांच्या नावाने मते मागून दाखवावी, असेही ते म्हणाले. या बैठकीत तीन प्रस्तावांवरही चर्चा झाली, त्यात उद्धव ठाकरेंवर विश्वास, बंडखोरांवर कारवाईचा निर्णय, मराठी अस्मिता-हिंदुत्वाचा मुद्दा धरुन ठेवण्याचा निर्णय़ झाला.

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे दोन मुद्दे उपस्थित केले आणि निधी आणि इतर विकासाच्या मुद्द्यावर आमदारांच्या तक्रारी ठेवल्या. उद्धव म्हणाले, 'भाजपसोबत जाणे मान्य नाही, पण निधीच्या मुद्द्यावर चर्चा करू, असे मी त्यांना सांगितले.

विशेष म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत 38 आमदार सध्या गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. शिंदे यांनी केवळ सरकार किंवा पक्षाविरुद्धच नव्हे तर ठाकरे कुटुंबाविरुद्धही बंडाचा झेंडा रोवला आहे.