सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले...

मी २५ फेब्रुवारीलाच वांद्रे पोलिसांना सुशांतच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. 

Updated: Aug 3, 2020, 06:45 PM IST
सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले... title=

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात आता प्रत्येक दिवशी नवे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासावरून सध्या मुंबई आणि बिहार पोलीस आमनेसामने आले आहेत. अशातच आता सुशांत राजपूतच्या वडिलांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी २५ फेब्रुवारीलाच वांद्रे पोलिसांना सुशांतच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. यानंतर १४ जूनला सुशांतचा मृत्यू झाला. तेव्हा मी २५ फेब्रुवारीला केलेल्या तक्रारीत ज्या लोकांची नावे नमूद केली होती त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, सुशांतच्या मृत्युला ४० दिवस उलटल्यानंतरही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे सुशांतच्या वडिलांनी सांगितले. 

पोलीस आणि महानगरपालिका आयुक्त म्हणजे उद्धव ठाकरेंचे पेड सेक्रेटरी- किरीट सोमय्या

त्यामुळे आता मुंबई पोलीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच माझ्या तक्रारीनंतर पाटणा पोलिसांनी तातडीने हालचाली सुरु केल्या. त्यांचे पथक सध्या मुंबईत दाखल झाले आहे, त्यांना मदत करण्यात यावी. या सगळ्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर नेत्यांनी आपल्याला बरीच मदत केली. मी या सगळ्यांचा आभारी असल्याचेही सुशांतच्या वडिलांनी म्हटले. 

सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी काही दिवसांपूर्वीच बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. तेव्हापासून मुंबई आणि बिहार पोलीस वारंवार आमनेसामने येताना दिसत आहेत. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी बिहार पोलिसांना महाराष्ट्रात तपासाची परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते.