मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद

या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Updated: Feb 19, 2020, 08:01 PM IST
मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद title=

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महाविकासआघाडीकडून राज्याच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी आकस्मिक निधीत १५ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात येईल. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१९पर्यंत दोन लाखांपर्यंतची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे. मार्च २०२०पासून ही योजना लागू होईल.

मात्र, ही कर्जमाफी फसवी असून अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार असल्याची टीका विरोधकांनी केली होती. तसेच ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, अशी मागणीही विरोधकांनी लावून धरली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही सर्व शेतकऱ्यांना न्याय देऊ, असे आश्वासन दिले होते. 

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत आणखी एक महत्त्वाच निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, नीरा डाव्या कालव्याचे बारामतील जाणारे पाणी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. भाजप सरकारच्या काळात कुरघोडीच्या राजकारणातून बारामतीला जाणारे हे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता महाविकासआघाडीने फडणवीस सरकारचा हा निर्णयही बदलला आहे.