राज्यात कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर, संस्थात्मक क्वारंटाईनवर भर - राजेश टोपे

दिलासा देणारी बातमी. कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला आहे. तसेच कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन पाचवर खाली आहे. 

Updated: Apr 23, 2020, 07:41 AM IST
राज्यात कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर, संस्थात्मक क्वारंटाईनवर भर - राजेश टोपे title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला आहे. तसेच कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन पाचवर खाली आहे. त्यामुळे राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत.  महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे, तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे, असे ते म्हणालेत.

आता मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम आजपासून सुरू करण्यात येणार आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.  कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले.

राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्का रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरुन सरासरी पाच वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात सुरुवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही. त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाचवर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तसेच कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील, असे ते म्हणालेत.