भाजपाच्या ‘400 पार’मध्ये अडथळा ठरल्याने निवडणूक आयुक्तांचा राजीनामा? मोदी-शाहांचा उल्लेखासहीत सवाल

Why Election Commissioner Arun Goel Resigned: "मोदी राजवटीतील उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी आहे. त्यात आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याची भर पडली आहे."

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 11, 2024, 07:30 AM IST
भाजपाच्या ‘400 पार’मध्ये अडथळा ठरल्याने निवडणूक आयुक्तांचा राजीनामा? मोदी-शाहांचा उल्लेखासहीत सवाल title=
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावरुन टीका

Why Election Commissioner Arun Goel Resigned: लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरे गटाने या निर्णयामागे वेगळं काही कारण नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात असतानाच आता या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका मांडताना शंकेला वाव असल्याचं म्हटलं आहे.

अचानक असे काय घडले

"निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता असताना केंद्रीय निवडणूक आयोगातच राजीनामा नाट्य घडले आहे. अरुण गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. मोदी सरकारनेच त्यांची नियुक्ती केली होती. मग अचानक असे काय घडले की, गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि तेवढ्याच तातडीने तो मंजूरही झाला? संपूर्ण देशाला हा प्रश्न पडला आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

नैतिकता मोदी-शहा यांच्याकडे आहे कुठे

"मुळात मोदी सरकारने अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी केलेली नेमणूक वादग्रस्त आणि अनैतिकही ठरली होती. एक आयएएस अधिकारी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतो काय आणि दुसऱ्याच दिवशी त्याची नियुक्ती निवडणूक आयुक्त म्हणून होते काय? हा सगळाच प्रकार धक्कादायक होता. त्यामुळे अरुण गोयल यांच्या नियुक्तीचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने गोयल यांची नियुक्ती रद्द केली नाही, परंतु या नियुक्तीच्या ‘वेगावर’ बोट ठेवलेच होते. या वेगाने गोयल यांची नियुक्ती करण्याची गरज काय होती? असा सवालच सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील सत्ताधीशांना विचारला होता. त्याचे उत्तर ना आजपर्यंत न्यायालयाला मिळाले आहे, ना जनतेला. एवढेच नव्हे तर मुख्य निवडणूक आयुक्तांसह अन्य दोन निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी ज्या त्रिसदस्यीय समितीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, त्यालाही मोदी सरकारने नवीन कायदा करताना धाब्यावर बसवले. या समितीतून थेट सरन्यायाधीशांच्याच समावेशावर फुली मारली आणि पंतप्रधान नामनिर्देशित मंत्री असा बदल केला. ही फुली निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पारदर्शक प्रक्रियेवर होती. आता अरुण गोयल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याबाबत विरोधकांपासून टीकाकारांपर्यंत केंद्राला प्रश्न विचारत आहेत, पण त्याची उत्तरे देण्याचे सौजन्य आणि नैतिकता मोदी-शहा यांच्याकडे आहे कुठे?" असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

‘चार सौ पार’मध्ये अडथळा?

न्यायमूर्ती पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये सहभागी झालेल्या अभिजीत गंगोपाध्याय यांच्याच मार्गाने गोयल जाणार का? अशी शंकाही ठाकरे गटाने उपस्थित केली. "गोयल यांनी आपण व्यक्तिगत कारणांसाठी राजीनामा दिला असे सांगितले असले तरी या खुलाशाने निर्णयाचा ‘संशयकल्लोळ’ कमी न होता प्रश्नांची वावटळ उठली आहे. गोयल हेदेखील भाजपचे निवडणूक आयोगातील ‘न्या. गंगोपाध्याय’ ठरणार का? ज्यांनी त्यांना ‘अनैतिक’ पद्धतीने पदावर बसवले, त्यांच्याशीच त्यांचे काही ‘नैतिक’ वगैरे मतभेद झाले का? मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या एकट्याच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक पार पाडण्याचा मोदी सरकारचा डाव आहे का? भाजपच्या ‘चार सौ पार’चे घोडे ज्या ‘ईव्हीएम’च्या वाऱ्यावर स्वार होणार आहे त्या घोड्याला अरुण गोयल यांचा काही लगाम बसण्याची भीती सत्ताधाऱ्यांना सतावत होती काय? त्यामुळेच चुनाव आयोगाला अधिक ‘विश्वासू’ नियुक्तीचा ‘चुना’ लावण्याचा सरकारचा खटाटोप सुरू आहे का?" असे प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केले आहेत.

नेमके कारण जाणून घेणे हा विरोधकांसह जनतेचा हक्क

"निवडणूक आयुक्त गोयल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीविषयीचे जुनेच प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित झाले आहेत. नोटाबंदी, जीएसटी, रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा, माजी केंद्रीय अर्थसचिव सुभाष गर्ग यांनी मोदी सरकारच्या रिझर्व्ह बँकेतील लाखो कोटींची गंगाजळी वापरण्यावर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह, कोरोना काळात उभारलेल्या ‘पीएम केअर’ फंडाचा हिशेब, सर्वोच्च न्यायालयानेच घटनाबाह्य ठरविलेल्या ‘इलेक्टोरल बॉण्डस्’चा तपशील; मोदी राजवटीतील उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी आहे. त्यात आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याची भर पडली आहे. त्यामागील नेमके कारण जाणून घेणे हा विरोधकांसह जनतेचा हक्क आहे. तथापि, गोयल यांच्या राजीनाम्याचे गूढ काय? हा प्रश्नही मोदी राजवटीतील इतर अनेक संशयास्पद रहस्यांचा भाग बनण्याची शक्यता जास्त आहे. या सगळ्या रहस्यांचा भेद करण्याचा विडा आता जनतेला उचलावा लागणार आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.