मुंबईला अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर पडू नका

मान्सून (Monsoon) सक्रीय झाल्यापासून मुंबईला ( Mumbai) चांगलेच झोडपून काढले आहे. पुन्हा एकदा मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काम नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.  

Updated: Jun 12, 2021, 10:57 AM IST
मुंबईला अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर पडू नका title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : मान्सून (Monsoon) सक्रीय झाल्यापासून मुंबईला ( Mumbai) चांगलेच झोडपून काढले आहे. पहिल्याच पावसात (heavy rainfall ) मुंबईची दाणादाण उडवून दिली. आता पुन्हा एकदा मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काम नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत रात्रीपासून संततधार सुरु आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. सकाळी काहीवेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला आहे.(Warning of very heavy rainfall to Mumbai)

संततधार, 10 दिवसातच महिनाभराचा पाऊस 

मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढलेला दिसून येतआहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस बसरत आहे. कुर्ला, घाटकोपर, सांताक्रुज, अंधेरीत जोरदार पाऊस कोसळत आहे. तर मुंबईच्या उपनगरांमध्येही पावसाची संततधार सुरुच आहे. गरज असल्यास बाहेर पडावे, असा इशारा हवामान विभागाने मुंबईकरांना दिला आहे. तसेच कोणीही मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई आणि ठाणे येथे गेल्या 24 तासात 120 मिमी विक्रमी जोरदार मुसळधार पाऊस झाला बोरीवली 132 मिमी, ठाणे 109.2 मिमी, टीएमसी 123.6 मिमी., मुंबई सांताक्रुझ येथे 107 मिमी. पालघर 144.4 मीमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामाना विभागाने आजही मुंबईत जोरदार पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे. 

हायटाईड, 4.41 मीटर उंचीच्या लाटा उसळणार

दरम्यान, दुपारी 1 वाजून 27 मिनिटांनी हायटाईड येणार आहे. समुद्रात 4.41 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनारी कोणीही जाऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या लोकल वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर जोरदार पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह संततधार पाऊस सुरू आहे.

तर दुसरीकडे येत्या 5 दिवसात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगडसाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवार आणि सोमवारी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.