भाजप नेत्यांना आम्ही 'चंपा' किंवा 'टरबुज्या' म्हणणार नाही! नाना पटोले यांचा टोला

राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झाल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे

Updated: Jul 11, 2021, 03:26 PM IST
भाजप नेत्यांना आम्ही 'चंपा' किंवा 'टरबुज्या' म्हणणार नाही! नाना पटोले यांचा टोला title=

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना 'महाराष्ट्रातील पप्पू' असं संबोधलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. 'चंद्रकांत पाटील आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना 'चंपा' किंवा 'टरबुज्या' म्हणणार नाही असं प्रतिउत्तर नाना पटोले यांनी दिलं आहे. राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झालेले आहेत अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे. 

'मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी'

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारकडे काही ठोस धोरण नाही. तसंच मोदी सरकारने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पेट्रोलियम मंत्री बदलून मोदींनी आपल्या अपयशाची कबुलीच दिली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे बोलघेवडे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करून मोदी सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

ईडी, सीबीआयचा वापर करून मोदी-शाह आमचा आवाज बंद करू शकले नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पोपटपंची करण्यापेक्षा केंद्राने जाणिवपूर्णक अडवून ठेवलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही त्यांनी लगावला