मराठा आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे एक कणही काढणार नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत उत्तर दिलं.

Bollywood Life | Updated: Dec 15, 2020, 06:02 PM IST
मराठा आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे एक कणही काढणार नाही - मुख्यमंत्री title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत उत्तर दिलं. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, 'राज्यात सध्या आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल, पण मागील वेळी आपण निर्णय घेतला होता तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. उच्च न्यायालयात आपण केस जिंकलो, सर्वोच्च न्यायालयात आपण गेलो तेव्हा वकीलांची फौज तशीच्या तशी ठेवली, भूमिकाही बदलली नाही.'

'माझ्या सहकारी मंत्र्यांनी समर्पक उत्तर दिलंय, आता तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचं ठरवलं असेल तर माहित नाही. सर्वानुमते ही लढाई आपण तिथे लढतोय, ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही लढाई जिंकावी अशी माझी प्रार्थना आहे. वेळोवेळी संघटनांबरोबर चर्चा चालू असते, अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकीलांबरोबर चर्चा करतात. ही लढाई सुरू असताना मध्येच कुणाच्या सडक्या डोक्यातून निघालं माहित नाही. मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचे आम्ही एक कणही काढणार नाही.' असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'ज्या कोणी समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या आगीवर पाणी टाकावं लागले. आपण टाकलं नाही तर राज्यातील जनता पाणी टाकेल. विरोधी पक्षांनी आमचं पुस्तक वाचन केलं. आधी कुंडल्या बघत होत्या, कुंडल्या बघणारे आता पुस्तक वाचायला लागले आनंद आहे. मुहुर्त बघत होते आज पडणार उद्या पडणार. कुंडल्या कुणी कुणाच्या बदलू शकत नाही. हे अधिवेशन दोन दिवसांचं घ्यावं लागले. दोन दिवस का घ्यावं लागलं तर कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याची आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं.