प्रबळ विरोधी पक्ष काय असतो ते दाखवणार - राष्ट्रवादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रबळ विरोधी पक्षाबाबत राष्ट्रवादीचा टोला

Updated: Oct 25, 2019, 09:19 PM IST
प्रबळ विरोधी पक्ष काय असतो ते दाखवणार - राष्ट्रवादी title=

मुंबई : सरकार आधीपासूनच अकार्यक्षम होते फक्त जाहिरातीच्या माध्यमातून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न होत होता. शिवसेना - भाजप युतीला बहुमत मिळाले. मात्र त्यांच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे. आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला तरी आमच्यात उत्साह आहे. कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष आहे. आता यांना काय प्रबळ विरोधी पक्ष असतो, हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दाखवणार आहे, असा थेट इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रबळ विरोधी पक्ष नसल्याचा दावा केला होता. त्याला नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावला आहे.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे झाली. लोकांना ट्रॅफिकचा प्रचंड त्रास होत होता म्हणून चुनाभट्टी ते बीकेसी असा कनेक्टर ब्रिज आम्ही मंजूर करून घेतला होता. आज ब्रिज पूर्ण होऊन दीड महिना झाला तरी उद्घाटन केले जात नाही. रविवारी बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर ब्रिजचे उद्घाटन राष्ट्रवादीतर्फे करून मुंबईकरांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी अधिक आक्रमक होणार आहे, असे संकेत नवाब मलिक यांनी दिलेत.

आघाडी सरकारच्या काळात मंजूर करुन घेतलेला पूल पूर्ण झाला. दीड महिना झाला तरी उद्घाटन केले जात नाही. मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही म्हणून चालढकल केली जात आहे. यांच्यासाठी जनतेने त्रास का सहन करायचा, असा सवाल करत हा पूल आम्ही जनतेसाठी खुला करणार आहोत. यासाठी जनतेने या सोहळ्यात आपलाही सहभागही नोंदवावा, असे आवाहन त्यांनी राष्ट्रवादीतर्फे केले आहे.