यात्रेच्या रथाखाली तीन जण ठार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या तुर्केवाडी यात्रेत रथ ओढताना झालेल्या दुर्घटनेत तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रथाची दोरी तुटल्यानं ही दुर्घटना घडली.

Updated: May 23, 2012, 04:02 PM IST

 www.24taas.com, कोल्हापूर

 

कोल्हापूर जिल्ह्यातल्या तुर्केवाडी यात्रेत रथ ओढताना झालेल्या दुर्घटनेत तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रथाची दोरी तुटल्यानं ही दुर्घटना घडली. त्यात हा रथ तिघांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. तर या घटनेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जण जखमी झालेत.

 

चंदगड तालुक्यातल्या तुर्केवाडीत दहा वर्षांनी लक्ष्मीदेवीची यात्रा भरते. त्यात रथ ओढला जातो. आज काही भाविक रथ ओढत असताना अचानक या रथाची दोरी तुटली आणि तीन भाविकांच्या अंगावरून रथ गेला. या दुर्घटनेत विठ्ठल चव्हाण, साळोबा चव्हाण आणि सुभाष ओऊळकर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल चव्हाण आणि साळोबा चव्हाण हे दोघंही मुरकुटेवाडीचे रहिवासी आहेत तर सुभाष ओऊळकर हे तुर्केवाडीचे रहिवासी आहेत. ही दुर्घटना घडल्यामुळे इतर भाविक मात्र गोंधळले आणि सैरावैरा धावू लागले. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरी १५ भाविक जखमी झालेत. जखमींवर चंदगड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.