टीम इंडियांची इज्जत बचाव

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला सपाटून मार खावा लागतो आहे. यामुळे धोनी अँड कंपनीवर चोहूबाजूंनी टीका होते आहे. आणि आता ऍडलेड टेस्ट टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे.

Updated: Jan 20, 2012, 11:31 PM IST

www.24taas.com, ऍडलेड

 

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला सपाटून मार खावा लागतो आहे. यामुळे धोनी अँड कंपनीवर चोहूबाजूंनी टीका होते आहे. आणि आता ऍडलेड टेस्ट टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे. एकीकडे भारतीय टीमवर हल्लाबोल असतांना दुसरीकडे मात्र भारतीय क्रिकेट टीमवर विश्वास दाखवला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी भारतीय टीम कोणत्याही टीमला पराभूत करु शकते अस मत व्यक्त केलं आहे.

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पर्थमधील पराभव टीम इंडियाचा परदेशातील सलग सातवा पराभव ठरला आहे. या पराभवाच्या मालिकेमुळे टीम इंडियावर सध्या टीकेची झोड उठली आहे. सिनियर क्रिकेटपटूंना हटविण्याची मोहिमही सुरु झाली. त्यांचा रिटायरमेंट प्लॅनही तयार आहे. काही क्रिकेट पंडितांनी तर पूर्णच्या पूर्ण टीम इंडियाच बदलून टाकण्याचा सल्लाही दिला आहे. एकीकडे टीकाकारांच्या रडावर धोनी अँड कंपनी आहे. मात्र, दुसरीकडे भारतीय क्रिकेट बोर्ड टीम इंडियाच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आगामी टेस्टमध्ये धोनीची भारतीय टीम कमबॅक करेल असा विश्वासही बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी व्यक्त केला आहे.

 

आधी इंग्लंडमध्ये टीम इंडियाला टेस्ट आणि वन-डे सीरिजमध्ये एकही विजय मिळविण्यात यश आलं नव्हतं. त्यानंतर मायदेशात अपेक्षप्रमाणे भारतीय टीम पुन्हा विजयी ट्रॅकवर परतली होती. मात्र, ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा टीमच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे परदेशात भारतीय टीम जिंकूच शकत नाही अशी भावना क्रिकेटप्रेमींच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, २००८ मध्ये भारतानं सीबी सीरिजमध्ये विजय मिळविला होता. त्यामुळे वन-डे सीरिजमध्ये धोनीची टीम वर्ल्ड चॅम्पियनसारखा खेळ करेल अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे. त्यातच बीसीसीआयही टीम इंडियाच्या पाठिशी असल्यानं, पराभवानं खचलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास थोडा का होईना पण वाढला असणार हे नक्की.