टीम इंडियाच्या ‘कारट्यां’ची गो-कार्टिंग!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभवानंतरही टीम इंडिया अजूनही गंभीर झालेली नाही. टीम इंडियाचे प्लेअर्स तिसऱ्या टेस्टपूर्वी सराव करण्याऐवजी पर्थमध्ये गो-कार्टिंग करण्याला पसंती दिली.

Updated: Jan 9, 2012, 06:11 PM IST

www.24taas.com,पर्थ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये पराभवानंतरही टीम इंडिया अजूनही गंभीर झालेली नाही. टीम इंडियाचे प्लेअर्स तिसऱ्या टेस्टपूर्वी सराव करण्याऐवजी पर्थमध्ये गो-कार्टिंग करण्याला पसंती दिली.

 

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आतापर्यंतच्या खऱाब कामगिरीवर क्रिकेट चाहते प्रचंड नाराज आहे. अनेक माजी टेस्ट प्लेअर्सनीही टीम इंडियाच्या सुमार कामगिरीवर टीका केली आहे, असं  असताना टीम इंडियानं सीरिज वाचवण्यासाठी मैदानावर घाम गाळण्याऐवजी गो-कार्टिंग करण्यात मशगूल असल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

दरम्यान, माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले होते. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय खेळाडूंच्या सरावाकडे पाहण्याच्या दृष्टीकोना विषयी गावस्करांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
ख्रिसमस ऑस्ट्रेलियातील मोठा सण आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू पहिल्या कसोटी नंतर त्यात सहभागी झाले तर समजू शकतं. पण आपल्या खेळाडूंचा त्याच्याशी काय संबंध, ते सराव का करत नव्हते?  ते ऑस्ट्रेलिया पाहण्यासाठी गेले आहेत का क्रिकेट खेळण्यासाठी गेले आहेत असा सवालच गावस्करांनी विचारला आहे.

 

पहिली कसोटी चौथ्या दिवशी संपली आणि त्यांनी पाचव्या दिवशी सुट्टी घेतली तर समजू शकतं पण त्यानंतर त्यांनी सराव का केला नाही. खेळाडूंचा खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीर नाही. आणि दौऱ्यावर असताना त्यांनी फक्त सराव, सराव आणि सरावच केला पाहिजे. आणि त्या संदर्भात कोणी प्रश्न का विचारत नाही. हे प्रश्न कोणीतरी विचारले पाहिजे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही कसोटीत भारताचा दारुण पराभव केला.