योगींचे बाण, फडणवीसांना ताण !

उत्तर प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील जनता किती समाधानी होते ते येणारा काळच सांगले. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयामुळे आणि वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र निश्चित वाढवली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 12, 2017, 05:07 PM IST
योगींचे बाण, फडणवीसांना ताण ! title=

धनंजय शेळके, प्रोड्यूसर, झी 24 तास : उत्तर प्रदेशात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावलाय. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील जनता किती समाधानी होते ते येणारा काळच सांगले. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयामुळे आणि वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र निश्चित वाढवली आहे. 

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावरुन विरोधी तसंच मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा एकही संधी सोडलेली नाही. त्यातच उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे तर विरोधकांच्या हल्ल्याला अधिकच धार आली. ते एवढ्यावरच थांबलं नाही. तर सत्तेवर आल्यावर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत योगींनी शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा केलीय. त्यामुळे तर फडणवीसांची चांगलीच कोंडी झाली. शेवटी त्यांना उत्तर प्रदेशातील कर्जमाफीचा अभ्यास सरकार करत आहे असं आश्वासन द्यावं लागलं. यामुळे कर्जमाफीची मागणी करणा-यांचं समाधान तर झालं नाहीच उलट विदर्भातील शेतक-यांनी उत्तर प्रदेशातल्या धर्तीवर राज्यात कर्जमाफी नको अशी मागणी करुन मुख्यमंत्र्यांची होमपिचवर कोंडी केलीय. यूपीच्या धर्तीवर राज्यात कर्जमाफी केल्यास विदर्भातील शेतक-यांवर अन्याय होईल अशी भीती तिथल्या शेतक-यांना वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झालीय.

  योगींनी फडणवीसांची दुसरी कोंडी केली आहे ती म्हणजे उत्तर प्रदेशाच्या विभाजनाच्या मुद्यावरून. जागरण या हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशाच्या विभाजनाची आवश्यकता नसल्याचं सांगितलं आहे. यापूर्वी केंद्रात एका पक्षाचे सरकार आणि राज्यात दुस-या पक्षाचे सरकार यामुळे उत्तर प्रदेशचा विकास रखडला होता. आता मात्र केंद्रात आणि उत्तर प्रदेशात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे राज्याचा विकास झपाट्याने होईल त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या विभाजनाची गरज नाही असं त्यांनी सांगितलंय. 
  
  वास्तवीक ही भूमिका भाजपच्या छोट्या राज्यांच्या भूमिकेला छेद देणारी तर आहेच, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही यामुळे अडचण झाली आहे. मुख्यमंत्री वेगळ्या विदर्भाचे समर्थक आहेत. मग केंद्रात आणि राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. मग ते विदर्भाचा विकास का करू शकत नाहीत अशी विचारणा होऊ लागलीय. थोडक्यात काय तर योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातून एकामागून एक बाण सोडत आहेत, त्यात विरोधक घायाळ होण्याऐवजी त्यांचे महाराष्ट्रातील सहकारी देवेंद्र फडणवीसच घायाळ होत आहेत.