'मनसे'चा झंझावात

यावेळेला ना कुठला प्रखर मुद्दा होता ना कुठलं खळ्ळ फटॅक! तरी पण प्रत्येक शहरात केवळ एकच सभा घेऊनही केवळ राज ठाकरे या नावावर मनसेला दिमाखदार असं यश लाभलं. मत विभाजन करणारा पक्ष अशी टीका करणाऱ्यांनाच आता मत खेचणारा पक्ष अस म्हणावं लागत आहे.

Updated: Feb 22, 2012, 09:47 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

यावेळेला ना कुठला प्रखर मुद्दा होता ना कुठलं खळ्ळ फटॅक! तरी पण प्रत्येक शहरात केवळ एकच सभा घेऊनही केवळ राज ठाकरे या नावावर मनसेला दिमाखदार असं यश लाभलं. मत विभाजन करणारा पक्ष अशी टीका करणाऱ्यांनाच आता मत खेचणारा पक्ष अस म्हणावं लागत आहे. मनसेच्या या विजयी वाटचालीचं आता लक्ष्य लागलंय ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना... राजकीय पटलावरचं मतदारांच्या दृष्टीने विश्वासाचं नवं केंद्र आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रस्थापित वर्चस्वाला धक्का देणारा एक पक्ष हे समीकरण मराठी मतदारांवर चांगलंच गारूड घालू लागलंय. शिवसैनिकाच्या मनातला भावी सेनाप्रमुख असं ज्य़ा राज ठाकरेंबद्दल भरभरुन बोलल जायचं, त्याच राजनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि शिवसेनेतचं नव्हे, तर चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शिवसैनिकांमध्ये विचारांचीच दुफळी माजली. शिवसेनेला बडव्यानी घेरलंय असा आरोप करत बंडखोर राज ठाकरे यांनी शिवसेनेला पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्षाच्या सुरवातीच्या सभेपासून  वातावरण निर्मिती करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. २००७ च्या महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आणि मनसेनं जोरदार हवाही निर्माण केली. पण निष्ठावंतानी मनसेला नाकारत केवळ सात जागांवर विजय मिळवून दिला. त्यावेळी साऱ्यांनीच ‘मनसे संपली हो’ अशी हाकाटी पीटायलाही सुरुवात केली. पण संपली संपली असं वाटत असतानाच लोकसभेच्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेला तडाखा दिला. आणि मुंबईतून शिवसेनेच्या सर्वच जागांवर पराभवाच तोंड पाहावं लागलं.

 

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेन आपले तेरा आमदार पाठवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली. त्यानंतर मात्र मनसेनं हळुहळू साऱ्याच सत्ताकेंद्रामध्ये आपला शिरकाव करायला सुरुवात केली. दोन महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही मनसेनं आपली खाती उघडायला सुरुवात केली. यानंतर मात्र साऱ्यांचच लक्ष लागलं ते मुंबई ठाण्याच्या महानगरपालिकेत मनसे काय चमत्कार करते याच्याकडे. आणि शिवसेनेसह राष्ट्रवादीला टार्गेट करत मनसेप्रमुखानी एकहाती प्रचाराचं मैदान मारायला सुरुवात केली आणि त्याचे पडसाद या निव़डणुकीत उमटलेच. जी मनसे गेल्या निवडणुकीत राजकीय विश्लेषकांना नगण्य वाटत होती तीच मनसे यंदाच्या निवडणुकीत ठळक वैशिष्ट्य ठरली आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावेळच्या निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करत पक्षाचा आलेख उंचावता नेला आहे. २००७ मध्ये मुंबईत सात जागांवर असलेली मनसे २०१२ मध्ये २८ जागांवर पोहोचली आहे. ठाण्यात तीन नगरसेवक यंदा सात झाले आहेत. पुण्यात मागच्या निवडणूकीत ८ जागांवर विजयी असणारी मनसे यंदा २९ जागांवर किंगमेकर बनली आहे. तर यंदा पहिल्यांदाच खातं खोलत पिंपरी-चिंचवड मध्ये चार जागा, उल्हासनगरमध्ये १ आणि नागपूरमध्ये दोन जागांवर विजय मिळवला आहे. तर नाशिकमध्ये सर्वच पक्षाना दणका देत मागच्या वेळचा १२आकडा यावेळेला तब्बल ४० वर गेलाय. राज ठाकरे यानी प्रचाराची एकहाती धुरा सांभाळत निवडणुकीचा पेपर दिला. जनतेसमोर खुल्या मुलाखतीला सामोर गेलेल्या राज ठाकरेंच्या प्रगतीपुस्तकात जनतेनं उत्तम प्रगतीचा शेरा मारलाय. या सर्वात आता लक्ष लागलय ते ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ची कशी असेल पुढची वाटचाल याकडेच.