(होळी स्पेशल) कोकणातील शिमगा

सध्या सगळं कोकण होळीच्या उत्साहात रंगलं आहे. कोकणातला शिमगा म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कोकणात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत.

Updated: Mar 7, 2012, 03:56 PM IST

www.24taas.com, सिंधुदुर्ग

 

सध्या सगळं कोकण होळीच्या उत्साहात रंगलं आहे. कोकणातला शिमगा म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कोकणात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी ही होय. होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते आणि ती नाचवली जाते. सगळ्या कोकणात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात.

 

ढोल ताशे वाजायला लागले की प्रत्येक कोकणी माणसाच्या अंगात शिमगोत्सव संचारतो. वर्षभर कोकणी माणसं या सणाची वाट पहात असतात. याच उत्सवासाठी मुंबईतले चाकरमानीही कोकणाची वाट धरतात. कोकणातल्या शिमगोत्सवात सगळ्यात प्रसिद्ध आहे तो कोकणातला पालखी महोत्सव. डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा उत्सव असतो. हा सोहळा ‘याची देही याचि डोळा’ पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. रत्नागिरी, दापोली या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होतो. प्रत्येक गावात हा पालखी उत्सव थोड्या फार फरकानं साजरा केला जातो.

 

ग्रामदेवतेच्या मंदिरातून ग्रामदेवतेची पालखी निघते. ही पालखी नाचवण्याची प्रत्येक गावातली पद्धत वेगळी आहे. दापोलीत ‘साई मित्र मंडळा’च्या पुढाकारानं जिल्ह्यातल्या तीस पालख्या एकाच मैदानात नाचवण्यात आल्या. कोकणातलं प्रत्येक घर आणि प्रत्येक गाव आपसातले मतभेद विसरुन या सोहळ्यासाठी एकत्र येतं. यावर्षी जवळपास दीडशे किलोमीटरचा प्रवास करुन अनेक पालख्या या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. विविध प्रकारच्या पालखी नृत्याचा सोहळा अतिशय देखणा झाला.

 

पालखी महोत्सवाला विशेष परंपरेबद्दल विशेष कुणाला माहीत नाही. पण जी परंपरा चालत आलीय, ती उत्साहात साजरी करायची आणि यानिमित्तानं चार क्षण सगळ्यांबरोबर आनंदाचे घालवायचे, एवढाच या उत्सवामागचा उद्देश असल्याचं ग्रामस्थ सांगतात. पालखी नृत्याबरोबरच दशावतार आणि विविध नृत्यंही सादर केली जातात.

कोकणातला शिमगोत्सव म्हंटला की अनेक मानापमान आणि वाद हे ओघानं आलंच.पण होळीच्या आधी एकमेकांच्या नावानं शिमगा करणारी हिच कोकणातली माणसं या सोहळ्याला मात्र मनापासून एकत्र येतात. त्यासाठीच अशा सोहळ्यांचं आयोजन महत्त्वाचं असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे.

 

 

या पालख्या शिमगोत्सवात एकत्र नाचल्या की पुढे त्या त्या गावी रवाना होतात. गावातल्या प्रत्येक घरापुढे ही पाळखी येते. सुवासिनी तिची पूजा करतात. तिच्यापुढे नवस बोलतात आणि पालखी पुढच्या घऱी जाते. या पालखी सोहळ्यासाठी कोकणाच्या बाहेर असलेले सगळे लोकही आवर्जून आपापल्या घरी पोहोचतात आणि या पालखी सोहळ्यातून भरपूर ऊर्जा आणि उत्साह घेऊनच पुन्हा परततात.