ऑडिट मतदारसंघाचं : औरंगाबाद

ऑडिट मतदारसंघाचं - औरंगाबाद

Updated: Apr 4, 2014, 01:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले म्हणजे काँग्रेसचे बुजूर्ग नेते... 1999 साली ते लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले... त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत होता. अंतुलेंसारख्या तगड्या उमेदवारापुढे पराभव झाला तर राजकीय कारकीर्दच धोक्यात येणार होती... पण या निवडणुकीत चक्क अंतुले पराभूत झाले आणि शिवसेनेचा हा नवोदित खासदार `जायंट किलर` म्हणून ओळखला जाऊ लागला... हा मतदार संघ आहे औरंगाबाद....
औरंगाबाद... मराठवाड्याच्या राजधानीचं शहर.. आशियातील सर्वात वेगानं वाढणारं शहर असा या शहराचा लौकीक आहे... महाराष्ट्राची पर्यटन राजधानी... इतिहासाचे अनेक जिवंत साक्षीदार या शहरात आणि परिसरात आहेत.... शहरातील बिबीका मकबरा या ऐतिहासिक स्थानापासून ते थेट जगप्रसिद्ध अजिंठा,  ऐलोरा लेण्यांपर्यंत... पुरातन काळातील भारताची राजधानी असलेला देवगिरीचा किल्ला ही औरंगाबाद मतदारसंघातच आहे...
 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात  मध्य औरंगाबाद, पूर्व औरंगाबाद आणि पश्चिम औरंगाबादचा समावेश होतो तर ग्रामीण भागातील गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांचा समावेश होतो..... औरंगाबादचा हा मतदारसंघ सध्या शिवसेनेचा गड मानला जातो..
पण यापूर्वी इथून काँग्रेस आणि जनता पार्टीचे दिग्गज उमेदवारही खासदार म्हणून निवडून आलेत. 1951 साली काँग्रेसचे सुरेश चंद्र, 1957 साली मराठवाड्यातले ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ, 1962 आणि 1967 साली काँग्रेसचे बी. डी. देशमुख, 1971 साली माणिकराव पालोदकर, 1980 मध्ये काझी सलीम, 1984 मध्ये एस काँग्रेसचे साहेबराव डोणगावकर हे निवडून आलेत. 1977 साली जनता पार्टीच्या लाटेत ज्येष्ठ नेते बापू काळदातेही औरंगाबादमधून लोकसभेवर विजयी झाले होते. 1998 साली काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांचा अपवाद वगळला तर, 1989 नंतर मात्र शिवसेनेचाच खासदार इथून निवडून येतोय. 1989 व 1991 मध्ये मोरेश्वर सावे आणि 1996 मध्ये प्रदीप जयस्वाल शिवसेनेचे खासदार झाले. गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे इथले खासदार आहेत.
इथं शिवसेनेचा जोर वाढण्याची काही कारणंही आहेत... औरंगाबाद हा निजामांच्या राजवटीतील भाग होता. त्यामुळे मतदारांची हिंदू आणि मुस्लिम अशी थेट विभागणी झालीय.. दलितांची संख्याही लक्षणीय आहे. पण दलित संघटना नेहमीच दोलायमान स्थितीत राहिल्या आहेत. रिपब्लिकन आठवले गट सध्या शिवसेनेसोबत आहे.. 
औरंगाबाद शहराची लोकसंख्या 24 लाख असली तरी मतदारांची संख्या मात्र फक्त 15 लाख 20 हजार आहे. त्यात 7 लाख 10 हजार महिला तर 8 लाख 10 हजार पुरूष मतदार आहेत..
एकूण मतदारांपैकी 70 टक्के मतदार हे शहरी भागातून आहेत, तर 30 टक्के मतदार ग्रामीण भागातील असल्याने दोन्ही मतदारांची मर्जी नेतेमंडळीला राखावी लागते.. शिवसेना नेहमीच हिंदू कार्डचा वापर करत निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न करते. मतदारांचा विचार केला तर हिंदू आणि दलित मतदारांची संख्या टक्केवारीत 75 टक्क्यांच्या आसपास आहे तर मुस्लिम मतदार 25 टक्क्यांमध्ये मोडतात. मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेससोबत राहिला आहे.
सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर औरंगाबाद मध्य हा शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्याकडे आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेचेच संजय शिरसाठ आमदार आहेत.. औरंगाबाद पूर्व मात्र शिवसेनेला नेहमीच कठीण गेलाय. गेल्या तीन टर्मपासून काँग्रेसचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा या भागाचं प्रतिनिधीत्व करतायत.. वैजापूरला गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेचेच आर. एम. वाणी आमदार आहेत. तर गंगापूरला राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार प्रशांत बंब यांचा दबदबा आहे.. कन्नड विधानसभा मतदारसंघात मनसेला रामराम ठोकणारे हर्षवर्धन जाधव आमदार आहेत.. एकेकाळी या सर्वच विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र गेल्यावेळेस शिवसेनेला हादरा बसला आहे..
यावेळेस एमआयएम या हैदराबादच्या पक्षानेही औरंगाबादेत आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केलीय. एरव्ही काँग्रेससोबत असणारे मुस्लिम मतदार एमआयएमकडे झुकल्यास त्याचा फायदा शिवसेनेलाच होऊ शकतो...

औरंगाबादच्या समस्या...
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादला विविध समस्यांनी ग्रासलंय... शिवसेनेचा खासदार असताना आणि औरंगाबाद महापालिकेत खैरेंच्याच पक्षाची सत्ता असताना इथल्या नागरिकांना कुणी वाली नाही, असं चित्र आहे... त्यामुळं इथल्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे...

गेल्या तीस वर्षांपासून चंद्रकांत खैरै औरंगाबादच्