ऑडिट मतदारसंघाचं : वर्धा

ऑडिट मतदारसंघाचं - वर्धा

Updated: Apr 4, 2014, 02:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वर्धा
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा जिल्हा म्हणजे वर्धा... महात्मा गांधींनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातून स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक आंदोलनांना सुरुवात केली. १९३६पासून बराच काळ बापूंचे वास्तव्य सेवाग्राम आश्रमात होते. त्यामुळं वर्ध्यात अजूनही पूर्ण दारूबंदी आहे.

आचार्य विनोबा भावेंनी त्यांच्या पवनार आश्रमातूनच सुप्रसिद्ध भूदान चळवळीचा प्रारंभ केला. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वर्धा मतदारसंघाचे देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच महत्वाचे योगदान आहे. मात्र महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या आश्रमांमुळे पावन झालेल्या या जिल्ह्याचे राजकारण मात्र उलट्या दिशेने सुरु आहे. राजकारणामुळेच हा मतदारसंघ विकासापासून कोसो मैल दूर आहे.
एकेकाळचे पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे दत्ता मेघे सध्या वर्ध्याचे खासदार आहेत... वर्धा मतदारसंघावर तसा पूर्वापार काँग्रेसचा पगडा होता... मात्र १९९१ला कम्युनिस्ट पक्षानं पहिल्यांदा इथं काँग्रेसला धक्का दिला होता.
१९५१ मध्ये वर्ध्याचे पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे नारायण अग्रवाल निवडून आले होते. त्यानंतर १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये कमलनयन बजाज लोकसभेवर विजयी झाले. १९७१मध्ये काँग्रेसचे जगजीवनराम कदम तर १९७७मध्ये संतोषराव गोडे वर्ध्याचे खासदार होते... एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत साठे यांनी १९८०, १९८४ आणि १९८९ असे सलग तीनवेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं...
मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात १९९१ मध्ये अनपेक्षितपणे कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंगारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांचा पराभव केला. १९९६ मध्ये भारतीय जनता पार्टीचे विजय मुडे यांनी इथून बाजी मारली. मात्र १९९८ला दत्ता मेघेंनी काँग्रेसला पुन्हा एकदा हा किल्ला काबीज करून दिला. परंतु शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मेघे आपल्या नेत्यासोबत राष्ट्रवादीत गेले.
१९९९मध्ये काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांनी इथून काँग्रेसचा हात कायम ठेवला. २००४मध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ पुन्हा एकदा या मतदारसंघात फुललं. सुरेश वाघमारे यांनी भाजपला हा मतदारसंघ जिंकून दिला. २००९मध्ये पुन्हा काँग्रेसवासी झालेल्या दत्ताभाऊंनी वर्ध्यातून निवडणूक जिंकली.
वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा, हिंगणघाट, देवळी, आर्वी हे वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येतात. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघांचा पुनर्रचनेनंतर वर्ध्यामध्ये समावेश करण्यात आला आहे..
गेल्या सहा लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकवेळी इथल्या मतदारांनी नव्या खासदाराला पसंती दिलीय. दत्ताभाऊंनी यावेळेस आपण निवडणूक नसल्याचं सुतोवाच केलं आणि आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून दिलीय. त्यामुळे पुन्हा एक नवा खासदार वर्धाकरांना मिळणार, असं सध्या तरी दिसतंय.
भारतातील सर्वात मोठ्या औद्यागिक घराण्यांपैकी बजाज घराण्याचे संबंध या मतदारसंघाशी जुळलेले आहेत. कमलनयन बजाज सलग तीनवेळा या मतदारससंघातून निवडून आलेत.
अशा या मतदारसंघाचे सध्याचे खासदार दत्ता मेघे यांची पुन्हा ओळख करून घेऊया...
> नाव - दत्ता राघोबाजी मेघे
> जन्म - 11 नोव्हेंबर 1936
> वय - 77
> शिक्षण - बीए
पूर्व विदर्भातील सर्वात ताकदवर काँग्रेस नेता म्हणून दत्ता मेघे यांची ओळख.... ११ नोव्हेबर १९३६ला वर्धा जिल्ह्यातील पवनारमध्ये सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले दत्ता मेघे यांचं बालपण अतिशय गरीबीत गेलं. मात्र आता विदर्भातील शिक्षणस्रमाट म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळखही निर्माण केलीय..
१९७८ला प्रथम ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. १९७८ ते १९८० दरम्यान ते अन्न व नागरी पुरवठा तसेच गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री होते. १९८४ ते १९८६ दरम्यान विधान परिषदेत ते विरोधी पक्षनेते होते. १९९१मध्ये वन आणि उर्जा मंत्रीपदही त्यांनी भूषवलं. १९९१मध्ये पहिल्यांदा ते खासदार म्हणून नागपूरमधून लोकसभेवर विजयी झाले.
१९९६मध्ये त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. तर १९९८ आणि २००९मध्येही ते वर्ध्यांतून लोकसभेवर पोहचले... दांडगा जनसंपर्क असलेले दत्ताभाऊ मतदारांची नाडी अचूक ओळखतात. त्यामुळे परिस्थितीनुसार मतदारसंघ बदलताना मुरब्बी राजकारणी असल्याचा परिचय त्यांनी दिला.