प्रादेशिक पक्षांना लोकसभा लढविण्यास बंदी घाला - CM

देशात स्थिर सरकार आणायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी घाला, अशी बेधडक मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 26, 2014, 10:44 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशात स्थिर सरकार आणायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी घाला, अशी बेधडक मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांपेक्षा राष्ट्रीय पक्षांना जनता अधिक कौल देईल, असं सांगत काँग्रेस आणि भाजपलाच जास्त जागा मिळतील, असा अप्रत्यक्ष दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचा विषय केवळ चर्चेला वाचा फोडण्यासाठी बोललो होतो. त्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल आणि त्याला विरोधी पक्षांचीही संमती लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस पक्षानं आजवर अनेक प्रादेशिक पक्षाशी युती केलीय. आता हा आधार तुटत असल्यानंच मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक पक्षांवर लोकसभा निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी केलीय, असा टोला शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी लगावलाय.
प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी असली पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांचं विधान वादग्रस्त बनलंय. काँग्रेस स्वतःच प्रादेशिक पक्ष होऊ घातला आहे, अशी टीका महाराष्ट्रातला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेनं केली आहे. तर देशातला प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपनंही मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या NCPनंही मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका केलीये.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.