सुट्टी न मिळाल्यानं तणावग्रस्त जवानाची आत्महत्या

बारामुल्ला जिल्ह्याच्या सीमांत क्षेत्रात तैनात असलेल्या सैन्याच्या एका जवानाने सोमवारी आपल्या सर्व्हिस रायफलनं स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 30, 2013, 04:09 PM IST

www.24taas.com, श्रीनगर
बारामुल्ला जिल्ह्याच्या सीमांत क्षेत्रात तैनात असलेल्या सैन्याच्या एका जवानाने सोमवारी आपल्या सर्व्हिस रायफलनं स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केलीय. मृत जवान हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असून त्याचं नाव तुला शंकर असल्याचं समजतंय.
‘३४ राष्ट्रीय रायफल्स तुकडी’मध्ये हा जवान तैनात होता. त्यानं आत्महत्या केल्यानंतर रात्री उशीरापर्यंत सेनेच्या आधिकाऱ्यांनी कोणताही खुलासा करण्याचं टाळलं.
सेनेच्या उच्च आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमांवर्ती भागात तैनात असलेल्या तुलानं घरी जाण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला होता. परंतू, काही कारणास्तव त्याची सुट्टी मंजूर होऊ शकली नाही. त्यामुळे तुला शंकरयाच्या मनावर दडपण आले आणि या दडपणातच तुला यानं आपल्या सर्विस रायफलनं स्वत:वर गोळी झाडली.

गोळीचा आवाज ऐकून अन्य जवान घटनास्थळी पोहचले. त्यांनी तुलाला तातडीने रुग्णालयात हलवलं. परंतू, हॉस्पीटलमध्ये पोहचण्याच्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. सोमवारी मृतदेहाचं पोस्टमार्टेम करून त्याचं शव त्याच्या गावी पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.