मोदी सरकार होत्याचं नव्हतं करू- आसाराम बापू

सोमनाथमध्ये आपल्या सत्संगाला परवानगी न दिल्यास मोदी सरकार उखडून फेकून देऊ अशी गर्जना आसाराम बापूंनी केली आहे. ही आक्रमक पूर्वसूचना त्यांनी गाजियाबादमध्ये प्रवचनादरम्यानच दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2013, 04:19 PM IST

www.24taas.com, गाजियाबाद
बलात्कार पीडित मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केल्यानंतर आसाराम बापूंनी पुन्हा एकदा जाहीर वक्तव्य करून लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधलं आहे. यावेळी त्यांचा स्वर जरी मवाळ असला, तरी बोलण्यात धमकीवजा इशाऱ्याचा सूर होता. आणि यावेळी त्यांनी संपवण्याची धमकी दिली आहे, ती चक्क नरेंद्र मोदी यांच्या सरकारला.
सोमनाथमध्ये आपल्या सत्संगाला परवानगी न दिल्यास मोदी सरकार उखडून फेकून देऊ अशी गर्जना आसाराम बापूंनी केली आहे. ही आक्रमक पूर्वसूचना त्यांनी गाजियाबादमध्ये प्रवचनादरम्यानच दिली आहे. आम्हाला दाबण्याची हिंमत करू नका. आम्हीच तुम्हाला होत्याचे नव्हते करून टाकू, असा दम आसाराम बापूंनी मोदी सरकारला दिला आहे. आम्हाला दुर्बल समजू नका. आमचं सत्संग संपवायला जाल, तर तुम्हीच नष्ट होऊन जाल, असं आसाराम बापू यावेळी म्हणाले.
यापूर्वी सौराष्ट्रमध्ये आसाराम बापूंच्या प्रवचनाला परवानगी नाकारली होती. यावर वक्तव्य करताना आसाराम बापूंनी आपल्या प्रवचनात नरेंद्र मोदींचं सरकार उखडून फेकू अशी धमकी दिली. एवढंच नव्हे, तर सौराष्ट्र पोलिस हे रावण सेनेच्याही वरचढ असल्याचं आसाराम बापूंनी म्हटलं. मृत्यूपूर्वी एकदा तरी सोमनाथमध्ये आम्ही प्रवचन देऊ असं विधान आसाराम बापूंनी केलं आहे.