शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - पंतप्रधान

शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असं सांगत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. दिल्लीत काल घडलेल्या घटनेमुळं आपण अतिशय दु:खी झालो असंही ते म्हणाले. 

Updated: Apr 23, 2015, 05:10 PM IST
शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - पंतप्रधान   title=

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असं सांगत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. दिल्लीत काल घडलेल्या घटनेमुळं आपण अतिशय दु:खी झालो असंही ते म्हणाले. 

दिल्लीत किसान रॅलीदरम्यान सर्वांदेखत झाडाला गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या गजेंद्र सिंग या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश हादरला. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. या मुद्यावर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी निवेदन दिल्यावर पंतप्रधानांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही खूप जुनी आणि व्यापक समस्या असून देशासाठी तो चिंतेचा विषय आहे. प्रत्येक सरकारनं त्यांच्या काळात ही समस्या सोडवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. भूतकाळात आपले प्रयत्न कुठे कमी पडले हे तपासून पाहण्याची गरज असून या समस्येवर योग्य उपाययोजना शोधण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. 

गजेंद्र सिंगच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी निवेदन द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत गदारोळ माजवल्यामुळं संसदेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं. गजेंद्र जेव्हा आत्महत्या करत होता तेव्हा पोलीस काय करत होते, त्यांनी त्याला रोखण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाही असा सवाल काँग्रेसचे गट नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. गजेंद्रच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असून याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.
 
कालची घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी असून कोणत्याही पक्षानं या मुद्यावरून राजकारण करू नये, असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. गजेंद्र सिंग आत्महत्या करण्यासाठी जेव्हा झाडावर चढला तेव्हा आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवत त्याला उकसवत होते. मात्र पोलिसांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, असं त्यांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करत गजेंद्रला वाचवायचा प्रयत्न केला, मात्र अखेर ते अपयशी ठरले, असं गृहमंत्री म्हणाले. याप्रकरणी संसदमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.