चार राज्यांत एकाच टप्प्यात होणार निवडणूक?

पाच राज्यातल्या निवडणूकांची घोषणा कुठल्याही दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक होऊ घातलेल्या राज्यातल्या निवडणूक अधिकाऱ्यांची  महत्वाची बैठक मंगळवारी घेतली. 

Updated: Jan 4, 2017, 09:03 AM IST
चार राज्यांत एकाच टप्प्यात होणार निवडणूक? title=

नवी दिल्ली : पाच राज्यातल्या निवडणूकांची घोषणा कुठल्याही दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक होऊ घातलेल्या राज्यातल्या निवडणूक अधिकाऱ्यांची  महत्वाची बैठक मंगळवारी घेतली. 

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यात निवडणूक होणार आहे. या बैठकीत मणिपूरमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. 

नागा दहशतवाद्यांनी मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांत आपल्या कारवाया पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. राज्यातले दोन महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग गेले दोन महिने नागा दहशतवादी संघटनांनी बंद केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून अत्यावश्यक वस्तूंची चणचण निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे हिंसाग्रस्त भागात मतदान प्रक्रिया सुरुळीत व्हावी, यासाठी काय उपाययोजना आखल्या जात आहेत याची माहिती आयोगानं यावेळी घेतली. 

सध्याच्या परिस्थितीत उत्तरप्रदेशात सात टप्प्यात तर उरलेल्या चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. पण मणिपूरमधली परिस्थिती बघता तिथल्या मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोग स्वतंत्र विचार करण्याची शक्यता आहे.