दररोजच्या खाण्यातली मिरची खिशालाही लागतेय तिखट!

झणझणी मिर्ची जेवणाची लज्जत वाढवते... पण रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक असलेली ही मिरची आता खिशालाही तिखट झालीय.   

Updated: Apr 2, 2016, 10:08 PM IST
दररोजच्या खाण्यातली मिरची खिशालाही लागतेय तिखट! title=

प्रशांत परदेशी, नंदुरबार : झणझणी मिर्ची जेवणाची लज्जत वाढवते... पण रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक असलेली ही मिरची आता खिशालाही तिखट झालीय.   

खरीप हंगाम वाया गेला आता रब्बीतही तीच अवस्था... त्यामुळे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातला मिरची उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. शिवाय मिरची दरवाढही झालीय. यावर्षी मिरचीची लागवड नगण्य झालीय. नंदुरबार जिल्ह्यात खरीपात पाच हजार तर रब्बीत एक हजार हेक्टरवर लागवड होते. पण यावर्षी खरीपात मोठ्य़ा प्रमाणात लागवड झाली पण पिक हाती आलं नाही. तर रब्बीत फक्त 98 हेक्टरवर लागवड झाली.  धुळे जिल्ह्यात तर ही लागवड झालीच नाही असं म्हणावं लागेलं. त्यामुळे, मिरची उत्पादक अडचणीत आलेत.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरात 50 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली. त्यातून 50 कोटींची उलाढाल झाली. ही उलाढाल दरवर्षीच्या तुलनेत नगण्यच... भरीस भर बाजर समिती आणि किरकोळ बाजारात मिरचीच्या दरात प्रचंड तफावत आहे. 

रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक असलेल्या मिर्चीचे दरही गगनाला भिडतायत. त्यामुऴे सामान्य नागरिकही हैराण झालाय. 

जिभेला तिखट लागणारी मिर्ची आता खिशालाही तिखट झालीय. आता मिर्चीबाबतही सरकारनं उपाययोजना करण्याची वेळ आल्याचंच आता वाटतंय...