साईबाबांच्या शिर्डीत डेंग्यूचे थैमान

साईबाबांच्या शिर्डीतही डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिडताप आदी तापांच्या आजाराने थैमान घातलं असून गेल्या १५ दिवसात डेंगीच्या आजाराने चार बळी घेतलेत. त्याचा निषेध म्हणून सतंप्त नागरिकांनी शिर्डी नगर पंतायत कार्यालयावर मोर्चा काढला. 

Updated: Sep 19, 2016, 10:35 PM IST
साईबाबांच्या शिर्डीत डेंग्यूचे थैमान title=

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीतही डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिडताप आदी तापांच्या आजाराने थैमान घातलं असून गेल्या १५ दिवसात डेंगीच्या आजाराने चार बळी घेतलेत. त्याचा निषेध म्हणून सतंप्त नागरिकांनी शिर्डी नगर पंतायत कार्यालयावर मोर्चा काढला. 

शिर्डीत गेल्या पंधरा दिवसात डेंगीने चार बळी घेतले आहेत. त्यामुळे सुस्त नगर पंचायती विरोधात नाराज नागरिकांनी धडक मोर्चा काढला. पंचायतीच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी आंदोलकांनी चांगलेच खडे बोल सुनावले. 

शिर्डी शहरात डेंग्यूचा कहर सुरूच असून शिर्डी उपनगरात कचरा आणि पावसामुळे डबक्यांतून डासांची मोठी पैदास होतेय. देशविदेशातले लाखो भाविक साईनगरीत येत असल्यानं आरोग्याचा बिकट प्रश्न निर्माण झालाय. 

शिर्डी साईबाबा संस्थानही रूग्णालयातही अपुरी जागा तसेच डॉक्टरांची रोडावलेली संख्या यामुळे रूग्णांना दुसरीकडे उपचारासाठी जाव लागतंय. तर आपण खबरदारी घेत असल्याचं नगर पंचायत प्रशासनानं सांगितलंय. 

शिर्डीत मोठया प्रमाणावर फैलावलेल्या रोगांवर नियंत्रण मिळवण्याबाबत प्रशासन फारसे गंभीर दिसत नसल्याने प्रशासनाला आणखी किती बळी हवे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.