कांदा सर्वसामान्यांना रडवणार!

येत्या काही दिवसांत कांदा सर्वसामान्यांना रडवणार अशीच चिन्हं आहेत. दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचं उत्पादन तीस ते पस्तीस टक्के उत्पादन कमी झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 6, 2013, 06:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
येत्या काही दिवसांत कांदा सर्वसामान्यांना रडवणार अशीच चिन्हं आहेत. दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याचं उत्पादन तीस ते पस्तीस टक्के उत्पादन कमी झालंय. त्यामुळे सप्टेंबरमध्ये नवा कांदा येईपर्यंत कांद्याचे भाव चढे राहणार आहेत.
उन्हाळ्यात धरणांचे पाणी शेतीला मिळालं नाही. परिणामी कांदा उत्पादन कमी झालंय. दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून शेतक-यांनी कांदा चाळीत ठेवलाय. दुसरीकडे गुजरातमध्येही कांद्याचं पिक तुलनेत कमी आल्यानं मुंबई, पुण्यात कांद्याचा पुरवठा मध्यप्रदेशातून होतोय. सप्टेंबरमध्ये नवा कांदा येईल. पण तोपर्यंत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या कांद्याचा भाव हजार बाराशे क्विंटलच्या आसपास आहे. रेल्वे वॅगन वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या तर कांद्याच्या भावांसंदर्भात थोडा फार दिलासा मिळणं शक्य आहे.
उन्हाळ्याचा फटका, मजुरांच्या रोजगारात वाढ, किटकनाशकं, खतांच्या किमतीत झालेली वाढ पाहता शेतक-याला दोन पैसे मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे काही काळ तरी कांदा भाव खाणार अशीच चिन्हं आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.