विधानसभेत आमदारांचं `ये रे माझ्या मागल्या...`

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन विविध करणांनी चांगलंच गाजलं. पण हे आंदोलन जनतेसाठी निराशाजनकच ठरलं. पिंपरी चिंचवड करांसाठी तर, ये रे माझ्या मागल्या सारखं हे अधिवेशन आलं आणि गेलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 6, 2013, 08:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी- चिंचवड
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन विविध करणांनी चांगलंच गाजलं. पण हे आंदोलन जनतेसाठी निराशाजनकच ठरलं. पिंपरी चिंचवड करांसाठी तर, ये रे माझ्या मागल्या सारखं हे अधिवेशन आलं आणि गेलं. अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या मुद्द्यावर शहरातल्या तीन आमदारांनी अधिवेशनात काहीच केलं नाही.
पिंपरी चिंचवडमधले अण्णा बनसोडे, विलास लांडे आणि लक्ष्मण जगताप असे तीन आमदार.... या तिघांनी फेब्रुवारी महिन्यात पत्रकार परिषद घेत मोठ्या थाटामाटात पिंपरी चिंचवडमधली घरं नियमित करण्याचा अध्यादेश सरकार काढेल, असं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनीही आठ दिवसांत घरं नियमित करण्याची घोषणा केली. पण सहा महिने उलटून गेले तरीया यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. या अधिवेशनात तरी आमदार विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करतील, अशी अपेक्षा होती. पण त्यावर पाणीच फेरलं.
अनधिकृत घरांच्या प्रश्नावर नाही म्हणायला महायुतीनं शहरातल्या नागरिकांचा मोर्चा काढत मुंबई गाठली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोणतंही ठोस आश्वासन दिल नाही. शहरात ३१ मार्च २०१२ पूर्वीची तब्बल १ लाख दहा हजार घरं आहेत. ती नियमित करण्याची फक्त घोषणा होतेय. पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आणि ज्या आमदारांकडे जनता डोळे लावून बसलीय, ते आमदार मात्र राजकारणात दंग आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.