जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर पांढरेंचे ताशेरे

जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर विजय पांढरेंनी पुन्हा एकदा टीका केलीय. विवेक गमावलेल्या, लोभी, स्वार्थी, भ्रष्ट लोकांच्या हाती खातं गेल्यामुळे सिंचनप्रकल्पांत गैरव्य़वहार बोकाळल्याचा घणाघाती आरोप पांढरे यांनी केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 8, 2012, 06:52 PM IST

www.24taas.com, पुणे
जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर विजय पांढरेंनी पुन्हा एकदा टीका केलीय. विवेक गमावलेल्या, लोभी, स्वार्थी, भ्रष्ट लोकांच्या हाती खातं गेल्यामुळे सिंचनप्रकल्पांत गैरव्य़वहार बोकाळल्याचा घणाघाती आरोप पांढरे यांनी केलाय. पुण्यातल्या पाट परिषदेत ते बोलत होते. ज्या प्रकल्पांची कामं 25 टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहेत ती टेंडर रद्द करावीत. तसं झाल्यास 42 हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि सिंचनाचा प्रश्न सुटेल असं पांढरेंनी म्हटलंय.
जलसंपदा खात्याच्या धोरणावरही पांढरेंनी टीकास्त्र सोडलंय. प्रकल्प राबवताना नियोजनाचा अभाव, विचार न करता प्रकल्पांची उभारणी अशा अनेक त्रुटी त्यांनी समोर आणल्या. सात हजार कोटींचं बजेट असताना 70 हजार कोटींची टेंडर काढली जातात. असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. अशा धोरणामुळेच प्रकल्प रेंगाळतात. आपली धोरणंच चुकीची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.
सिंचन धोरण खर्चिक आणि परवडणारं नसल्यानं त्या धोरणात बदल आवश्यक असल्याचं पांढरेंनी सांगितलंय. तसंच तापी योजनेवरून पांढरेंनी एकनाथ खडसेंवरही टीका केलीए. हजारो कोटी रुपये खर्चून काहीही फायदा नाही. गोसीखुर्दचंही तसंच आहे. त्याठिकाणी प्रकल्प पूर्ण झालाय. मात्र पुनर्वसन रखडल्यानं पाणी साठवता येत नाही. असं उदाहरण यावेळी पांढरेंनी दिलं.