आता तरी बदला घ्या !

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज 4-1 नं गमावल्यानंतर टीम इंडिया मंगळवारी मैदानात उतरेल ती बदला घ्यायला.

Updated: Jan 25, 2016, 08:45 PM IST
आता तरी बदला घ्या ! title=

ऍडलेड: ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज 4-1 नं गमावल्यानंतर टीम इंडिया मंगळवारी मैदानात उतरेल ती बदला घ्यायला. मंगळवारी ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. 
मागच्या वर्षी टी-20 मध्ये टीम इंडियाची कामगिरी काही फारशी चांगली नव्हती. झिम्बाब्वेविरुद्ध झालेली टी-20 सीरिज 1-1 नं बरोबरीत राहिली होती. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला 2-0 नं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-20 सीरिजमध्ये युवराज सिंग, हरभजन सिंग आणि आशिष नेहरानं कमबॅक केलं आहे. तर वनडे सीरिजमध्ये डच्चू मिळालेला सुरेश रैनाही टी-20च्या टीममध्ये आहे. भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कपही आता अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपला आहे. त्यामुळे या सगळ्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.  

तर ऑस्ट्रेलिया मात्र मागच्या वर्षी एकही टी-20 सामना खेळलेली नाही. नोव्हेंबर 2014 साली इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाची लढत झाली होती. त्यानंतर कांगारु फक्त वनडे आणि टेस्ट क्रिकेटच खेळले आहेत.