जागा एक खेळाडू तीन, टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार?

India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडे सलामीसाठी तीन पर्याय आहेत. त्यामुळे रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात कोण करणार याकडे क्रकिेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 10, 2024, 04:30 PM IST
जागा एक खेळाडू तीन, टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार?  title=

India vs Afghanistan T20 Series : जागा एक खेळाडू तीन अशी स्थिती सध्या टीम इंडियाच्या सलामीसाठी बनली आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान (India vs Afghanistan) 11 जानेवारीला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. मोहालीत होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्माबरोबर (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) डावाची सुरुवात कोण करणार? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सलामीसाठी टीम इंडियाकडे तीन पर्याय आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 16 खेळाडूंचा भारतीय संघ निवडण्यात आलीय. यात सलामीच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. यातली पहिली जोडी आहे रोहित-यशस्वी, दुसरी जोडी आहे रोहित-शुभमन आणि तिसरी जोडी आहे रोहित-विराट.

यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे, तिनही पर्यायांमध्ये रोहित शर्मा कायम आहे. आता रोहितबरोबर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), शुभमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यापैकी कोणता फलंदाज ओपनिंगला येतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आगामी टी20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा पर्याय महत्त्वाचा ठरणार आहे. 

रोहित-यशस्वीची जोडी
सर्वात आधी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल जोडीचा विचार करुया. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वल जोडीने अद्याप एकदाही टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केलेली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित-यशस्वीने दमदार ओपनिंग केली आहे. पण अफगाणिस्तानविरुद्ध ही जोडी मैदानावर उतरल्यास टी20 क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ असेल. 

रोहित शर्मा-शुभमन गिल
टीम इंजियाकडे दुसरा पर्याय आहे तो म्हणजे रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीचा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीच्या या जोडीने शामदार कामगिरी केलीय. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातही रोहित-गिलने टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. पण टी20 क्रिकेटमध्ये रोहित-गिल अद्याप सलामीसाठी एकही सामना खेळलेले नाहीत. 

रोहित शर्मा-विराट कोहली
सलामीचा तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे रोहित शर्मा - विराट कोहली जोडीचा. रोहित-विराट जोडीने तब्बल 29 टी20 सामन्यात भारतीय डावाची सुरुवात केली आहे. या जोडीने 40 च्या अॅव्हरेजने तब्बल 1160 धावा केल्या आहेत. 138 धावांची सर्वोत्तम भागिदारीही त्यांच्या नावावर आहे. 

सध्याच्या संघात रोहित-विराटची जोडी सलामीासाठी सर्वात अनुभवी जोडी आहे. पण लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनचा विचार केला तर रोहित-यशस्वी जोडीचं पारडं जड आहे. टी20 क्रिकेटमध्ये विराट आणि शुभमन गिलपेक्षा यशस्वी जयस्वलाचा स्ट्राईक रेट जास्त आहे. पॉवर प्लेमध्येही यशस्वीची धावसंख्या जास्त आहे.