भारत-बांगलादेश कानपूर कसोटीवरुन धमकी... बीसीसीआय मोठा निर्णय घेणार?

India vs Bangladesh Test Match : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी साना चेन्नई तर दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पण कानपूर कसोटीवरुन धमकी देण्यात आली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 11, 2024, 07:49 PM IST
भारत-बांगलादेश कानपूर कसोटीवरुन धमकी... बीसीसीआय मोठा निर्णय घेणार? title=

India Vs Bangladesh Kanpur Test Threat : मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडिया (Team India) येत्या 19 सप्टेंबरपासून मैदानावर उतरणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान (India vs Bangladesh) दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईत रंगणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरला कानपूरमध्ये (Kanpur) होणार आहे. पण त्याआधी दुसऱ्या म्हणजे कानपूर कसोटी सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंदू महासभेने कानपूर कसोटी सामन्यावरुन धमकी दिली आहे.

हिंदू महासभेची धमकी

बांगलादेशमध्ये हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेने बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध निदर्शनं करण्याची धमकी दिली आहे. सुरक्षेचा विचार करता कानपूर कसोटी सामन्याचं ठिकाण बदललं जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण बीसीसीआयने ही शक्यता फेटाळून लावली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यानचा दुसरा कसोटी सामना कानपूरमध्येच खेळवला जाणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयसमोर ऑप्शन बी?

कानपूरमधल्या परिस्थितीवर बीसीसीआय लक्ष ठेऊन आहे. हिंदू महासभेने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडे ऑप्शन बी तयार आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण बीसीसीआयने कानपूरमध्ये सामना खेळवण्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं सांगितलं. बीसीसीआयचे अधिकारी कानपूर क्रिकेट असोसिएशनच्या संपर्कात आहेत, आणि स्टेडिअम खेळाडू आणि प्रेक्षकांचं स्वागत करण्यास सज्ज असल्याचंही बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बांग्लादेशचा भारत दौरा पहिला

कसोटी सामना - चेन्नई- 19 ते 23 सप्टेंबर

दूसरा कसोटी सामना - कानपुर- 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर

पहिला टी20 सामना - ग्वालियर- 6 ऑक्टोबर

दूसरा टी20 सामना- दिल्ली- 9 ऑक्टोबर

तीसरा टी20 सामना- हैदराबाद- 12 ऑक्टोबर

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडिया मैदानावर 

श्रीलंका एकदिवसीय मालिकेनंतर तब्बल 43 दिवसांच्या मोठ्या ब्रेकनंतर टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. बांगलादेशने नुकतंच पाकिस्तानवर कसोटी मालिकेत 2-0 अशी मात केली आहे. त्यामुळे बांगलादेशला हलकं लेखून टीम इंडियाला चालणार नाही. यासाठी बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कहोली, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह या दिग्गजांचा संघात समावेश केला आहे.