'मी निवृत्ती घेत नाहीये, पण...', वर्ल्ड कप फायनलनंतर या स्टार खेळाडूने सांगितलं सत्य

David Miller Statement on Retirement Rumours : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलनंतर साऊथ अफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने निवृत्ती घेतल्याची चर्चा झाली. त्यावर त्याने खुलासा केलाय.

सौरभ तळेकर | Updated: Jul 3, 2024, 04:24 PM IST
'मी निवृत्ती घेत नाहीये, पण...', वर्ल्ड कप फायनलनंतर या स्टार खेळाडूने सांगितलं सत्य title=
david miller statement on retirement

David miller statement on retirement : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सर्व सामने जिंकल्यानंतर साऊथ अफ्रिकेला अखेरच्या सामन्यात टीम इंडियाकडून पराभव स्विकारावा लागला. साऊथ अफ्रिकेचं स्वप्नभंग झाल्याने खेळाडू मैदानातच ढसाढसा रडल्याचं दिसून आलं. टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यासोबतच साऊथ अफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने देखील निवृत्ती जाहीर केली, अशी माहिती समोर आली होती. अशातच यावरच डेव्हिड मिलरने खुलासा केला आहे.

मी अजूनही टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. मी प्रोटीज संघाकडून (साऊथ अफ्रिका संघाकडून) खेळत राहीन. यापुढे देखील आगामी स्पर्धांमध्ये मी साऊथ अफ्रिका संघाचा भाग असेल, असं डेव्हिड मिलरने म्हटलं आहे. एवढंच नाही तर संघासाठी सर्वोत्तम अजून द्यायचं आहे, असंही डेव्हिड मिलर याने म्हटलं आहे. डेव्हिड मिलरने सत्य सांगितल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलच्या पराभवानंतर डेव्हिड मिलरने एक पोस्ट शेअर केली होती. मी खूप दुःखी आहे. दोन दिवसांपूर्वी जे घडलं ते पचवणं फार कठीण आहे. मला कसं वाटतं ते मी स्पष्ट करू शकत नाही. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मला माझ्या संघाचा अभिमान आहे. हा प्रवास खूपच अप्रतिम होता. संपूर्ण महिना चढ-उतारांनी भरलेला होता. आम्ही वेदना सहन केल्या आहेत, परंतु मला माहित आहे की या संघात ताकद आहे, असं डेव्हिड मिलरने म्हटलं आहे.

 दरम्यान, डेव्हिड मिलरच्या कॅचमुळे सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला होता. सूर्यकुमार यादवच्या भन्नाट कॅचमुळे साऊथ अफ्रिका बॅकफूटवर आली अन् टीम इंडियाने सामना खिशात घातला होता. जर मिलरचा कॅट सूर्याने पकडला नसता तर टीम इंडियासाठी विजय सोपा राहिला नसता. हार्दिक पांड्याला अखेरच्या ओव्हरमध्ये आणखी मेहनत घ्यावी लागली असती अन् कदाचित सामना टीम इंडियाला गमवावा देखील लागला नसता.